पतियाळा – इंडियन ग्रांप्री अॅथलेटिक्स स्पर्धेतून आतापर्यंत केवळ गोळाफेकपटू तजिंदर तूल याला ऑलिंपिकचे तिकिट मिळविण्यात यश आले आहे. ऑलिंपिक पात्रतेच्या अखेरच्या स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. पुढील महिन्यात जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
तजिंदर तुलसह महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले चमू, स्प्रिटंर द्युती चंद आणि हिमा दास यांनी सर्वोत्तम राष्ट्रीय कामगिरीची नोंद केली. मात्र, त्यापैकी केवळ तजिंदरलाच ऑलिंपिक पात्रता सिद्ध करण्यात यश आले.
गोळा फेक प्रकारातील खेळाडू २६ वर्षीय तजिंदरने २१.४९ मीटर गोळा फेक करून पात्रतेसाठी असलेला २१.१० मीटरचा अडथळा पार केला. आजच्या पहिल्याच प्रयत्नांत त्याने राष्ट्रीय विक्रमासह ऑलिंपिक पात्रता गाठली.
त्यानंतरच्या प्रयत्नांत त्याने २१.२८ मीटर, २१,१२ मीटर आणि २१.१३ मीटर अशी गोळा फेक केली. तजिंदरने आपलाच २०१९ मधील २०.९१ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
याशिवाय महिलांच्या थाळी फेक प्रकारात कमलप्रीत कौर हिने ६६.९ मीटर थाळी फेकून राष्ट्रीय विक्रम केला. मात्र, या स्पर्धा प्रकारात ती एकटीच सहभागी असल्याने हा विक्रम ग्राह्य धरण्यात आला नाही.
इंडियन ग्रांप्री अॅथलेटिक्स स्पर्धेत
- ४ बाय १०० मीटर रिले महिला संघाची देखिल राष्ट्रीय विक्रमाची नोंद
- हिमा दास, द्युती चंद, एस. धनलक्ष्मी आणि अर्चना सुसींद्रन या चौघींनी ४३.३७ सेकंद अशी वेळ
- या चौघींनी ४३.४२ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडला
- त्यांना ४३.०५ सेकंद ही ऑलिंपिक पात्रता वेळ गाठण्यात अपयश
भारतीय संघ जागतिक मानांकनानुसार २२व्या स्थानावरून २०व्या स्थानावर - ऑलिंपिकमध्ये केवळ जागतिक मानांकनातील पहिले सोळाच संघ पात्र ठरणार