45 वर्षांपूर्वी गुऱ्हाळात गुळव्या म्हणून काम करणाऱ्या मारुती कांबळे यांनी भिगवणमध्ये हॉटेल व्यवसायाचा नवा मार्ग चोखाळला. कोणताही अनुभव नसताना सहकाऱ्यांच्या मदतीने मारुती कांबळे यांनी छोटंसं नाष्टा सेंटर सुरू केले. त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने घरगुती खानावळ सुरू केली. दर्जेदार, चविष्ट मच्छी ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आता सुवर्णमहोत्सवी वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या “हॉटेल जय मल्हार’चा प्रवास तिसऱ्या पिढीपर्यंत स्थिरावला आहे. संपूर्ण कुटुंब यात झोकून देऊन काम करीत असल्याने “हॉटेल जय मल्हार’ हे संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातील खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे.
भिगवणला जावे आणि मासे खावे, ही प्रथा ग्राहकांच्या अंगवळणी पडली आहे. गोड्या पाण्यातील मासे खवय्यांचे आवडते ठिकाण म्हणजे भिगवण. ही भिगवणची महत्वाची ओळख. पण ही ओळख ज्यांनी निर्माण केली, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे “जय मल्हार मच्छी खानावळ’.
मारुती मल्हारी कांबळे ऊर्फ कोळी भाऊ हे कुटुंबाच्या चरितार्थासाठी गुऱ्हाळात गुळव्याचे काम करीत होते. त्यानंतर त्यांनी नावीन्यतेचा ध्यास घेत नवा व्यवसायाचा मार्ग चोखळला. त्यांनी 1975 मध्ये लगतच्या नातेवाईकांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला चहा आणि नाष्टा इतकेच मेनू असलेले छोटेसे हॉटेल सुरू केले. दहा वर्षे व्यवसायात रूजल्यानंतर हॉटेलमध्ये नवा आणि महत्त्वाचा मेनू सुरू केला. तो म्हणजे मासे. 1985 नंतर भाऊंच्या माशांची चव भिगवणकरांच्या आवडीची बनलीच. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, भुसावळ, नाशिक आदी पश्चिम महाराष्ट्र व परराज्यांतून भिगवण परिसरात येणाऱ्या खवय्यांची मासे खाण्याची इच्छा “जय मल्हार’ने तृप्त केली.
भिगवणला मासे खवय्यांची राजधानी बनवण्यात भाऊंच्या जय मल्हार खानावळीचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये अनन्यसाधारण आहे. भाऊंनी 1975 मध्ये लावलेले हे रोपटे आता मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. भाऊंचे चिरंजीव रामभाऊ हे त्यांच्या मुलांच्या मदतीने हा व्यवसाय सचोटीने आणि कष्टाने सांभाळत आहेत. विशेष म्हणजे आता भाऊंची तिसरी पिढी व्यवसायात येऊन सुद्धा भोजनाच्या चवीमध्ये तसूभर सुद्धा बदल झाला नाही. पूर्वी रोहू, कटला माशांची चलती होती. आता मात्र ग्राहक चिलापीच्या चवीसाठी आतुरलेले आहेत.
भाऊंचा खानावळीतील “मसाला फ्राय’ म्हणजे आहा..हा! हळद-मिठातील मासा तर ग्राहक पुन्हा येणार आणि मागणार म्हणजे मागणारच, असाच असतो. घरगुती जेवण पण “अप्रतिम चव’ हे ब्रीद वाक्य महाराष्ट्रासह परराज्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. आता जय मल्हार आय.एस.ओ. 9001:2015 द्वारे मानांकित झाले आहे. संपूर्ण कुटुंब यात झोकून देऊन काम करीत असल्याने जय मल्हारच्या यशस्वी व्यवसायात तीन पिढ्यांची तपश्चर्या फळाला आली आहे. ग्राहकांची तृप्ती, दर्जा या बळावर “जय मल्हार मच्छी खानावळ’ हे सुवर्णमहोत्सवी वर्षांकडे वाटचाल करीत आहे.
ताजा, घरगुती मसाल्याची खासियत
भोजनाची दुसरी महत्त्वाची खासियत म्हणजे उजनीच्या ताज्या माशांबरोबर भाऊंच्या कुटुंबीयांकडून दररोज बनविला जाणारा ताजा व घरगुती मसाला. यांची परिपूर्ण मच्छी-रेसिपी. त्याच्या जोडीला चुलीवरची गरम भाकरी. यामुळेच जय मल्हार हे चोखंदळ मच्छी खवय्यांचे आवडते ठिकाण बनले आहे.
शब्दांकन : डॉ. सुरेंद्र शिरसट (भिगवण)