पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून आमदार लक्ष्मण जगताप यांनी सारवासारव केली. सुरुवातीला अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र राहिली असती तर बांधकामे नियमित झाली असती, असा दावा करणाऱ्या जगताप यांनी या मुद्दयावरून सारवासारव करत बांधकामे नियमित करण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करू असा दावा केला.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी महापालिका हद्दीतील बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. शहरात तब्बल सव्वा लाखाहून अधिक बांधकामे अनियमित असतानाही केवळ सात बांधकामे नियमित झाली आहेत. हजारो प्रस्ताव आल्यानंतरही किचकट नियम, अधिकाऱ्यांची अनास्था, प्रचंड बांधकाम शुल्क, दंड या बाबींमुळे अनधिकृत बांधकामे नियमित होण्यास अनेक अडचणी आल्या होत्या. केवळ सात बांधकामे नियमित झाल्यामुळे तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायम राहिल्यामुळे शासनाचा निर्णयाचा काहीही उपयोग
झाला नाही.
हाच मुद्दा उपस्थित करून प्राधिकरणाच्या बांधकाम नियमितीकरणाबाबत विचारले असता जगताप म्हणाले, शासनाने अत्यंत शिथिल अटींसह बांधकामे नियमित करण्याचा कायदा केला होता. नागरिकांनी आपले बांधकामे नियमित करून घेणे गरजेचे होते. मात्र महापालिकेच्या प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आपली बांधकामे नियमित न केल्याचा दावा केला. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत नागरिकांनामध्ये प्रबोधन न झाल्याचा दावाही करताना अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे त्यांनी लक्ष वेधले.
मात्र यापुढे अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे होणार का? या प्रश्नावरून मात्र त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यापुढे आम्ही नागरिकांमध्ये प्रबोधन करू, घरे पाडण्यापेक्षा सकारात्मक विचार करून आणखी काय करता येईल का? याबाबत आम्ही पुढकार घेऊ म्हणत त्यांनी अनधिकृत बांधकामे आणि त्यावरील कारवाईच्या मुद्द्याला बगल देत सारवासारव केली. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायमच राहणार हे स्पष्ट झाले आहे.