सुभाष कदम
शिराळा – शिराळा तालुक्यातील कंनदूर येथे यावर्षी गुऱ्हाळ घराच्या हंगामाला एक महिना उशीरा सुरुवात झाली आहे. मात्र कामगारांचा तुटवडा, गूळ उत्पादन साहित्याचे वाढलेले दर व गुळाला अपेक्षित नसलेला दर अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा गूळ उद्योग सापडला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात यावर्षी केवळ पाच गुऱ्हाळ घरांची उभारणी होईल असे चित्र सद्या दिसून येत असले तरी गुऱ्हाळ उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा गुळाच्या बाबतीत माहेरघर आहे. मात्र शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळ उद्योगाला घरघर लागली आहे. शिराळा तालुक्यातील कंनदूर येथे या वर्षी गुऱ्हाळ हंगामाला एक महिना उशीरा सुरुवात झाली असून यासाठी कामगारांचा असणारा तुटवडा व गुळ उत्पादन साहित्याचे वाढलेले दर त्याच बरोबर गुळाला नसलेले अपेक्षित दर यामुळे हा व्यवसाय अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे या गुऱ्हाळ उद्योगासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
या उद्योगाला पूर्वीसारखे दिवस राहिले नसल्याने असंख्य ग्राहकांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. शिराळा तालुक्यामध्ये यापूर्वी 50 ते 60 गुऱ्हाळ घरांची संख्या असायची.परंतु आता केवळ 5 उद्योग याप्रकारे सुरु होतील अशी अपेक्षा आहे. त्यातच यावर्षी गुऱ्हाळ उद्योगाला महापुराचा फटका बसला असून त्यांची पडझड व हानीमुळे काही गावातील गुऱ्हाळ घरे अद्यापी सुरु झालेली नाहीत. यापूर्वी केवळ कंनदूर गावात सर्वाधिक 11 उद्योग होते. आता याठिकाणी एकच गुऱ्हाळ घर राहिले आहे. वाढत्या महागाईमुळे व गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. या भागात गुऱ्हाळ उद्योगाची परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
शिवाय गुळाला चांगला दर मिळण्यासाठी शासकीय पातळीवरील धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. गुऱ्हाळ घरासाठी चांगल्या दर्जाचा ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व कामगारांना प्रशिक्षण आणि व्यवस्थापन याविषयी माहिती होणे अपेक्षित आहे. कामगारांचा वाणवा, मजूरीत होणारी वाढ व तालुक्यात यावर्षी ऊसाचा पडणारा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. एक गुऱ्हाळ घर चालवण्यासाठी किमान वीस माणसांची गरज असते.सध्या कामगार मिळत नाहीत व साहित्याचे दरही वाढलेले आहेत. तर गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. भांडवलाची कमतरता आहे. कामगारांना पगार वाढवून द्यावा लागत असून हा उद्योग सुरु होण्यापूर्वी मजूरांना उचली द्यावे लागत आहेत, अशा अनेक समस्यांमुळे शिराळा तालुक्यातील गूळ उद्योग संपण्याच्या मार्गावर आहे. उद्योग वाचवण्यासाठी मदतीची गरज आहे.
कंनदूर येथील सुभाष पाटील यांनी हंगामाला सुरुवात केली आहे. मात्र तालुक्यात यावर्षी एकूण पाच गुऱ्हाळ घरे सुरु होतील असे चित्र आहे. शासनाने गुऱ्हाळ उद्योग वाचवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यावर शासनाने काही उपाययोजना न केल्याने ग्राहकांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. काही वर्षांपूर्वी शिराळा तालुक्यातील गावांची संख्या 60 च्या घरात होती. एकट्या कंनदूर गावात सर्वाधिक 11 घरे होती. आता एकच राहिले आहे. वाढत्या महागाईमुळे व गुऱ्हाळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. हा गुऱ्हाळ उद्योग वाचवण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्याची गरज आहे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.