राजगुरूनगर -जिल्ह्यात ढगाळ वातावरण निवळल्याने, हवामान कोरडे झाले आहे. परिणामी, गुलाबी थंडी जाणवत असून, मंगळवारी किमान तापमानाचा पारा 12 अंशापर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेली चक्रीय स्थिती आता भारतीय किनारपट्टीपासून दूर सरकली असून, तिची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे असल्याने किमान तापामानाचा पारा काही अंशी घसरला आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
किमान तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी झाले होते. दरम्यान, दि. 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आकाश अंशत: ढगाळ राहील आणि काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.