लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मनाला काय योग्य वाटते याचा विचार करायला हवा. कारण लोकांची मते ही कालानुरूप बदलतील कदाचित. परंतु लोक काय म्हणतील म्हणून गमावलेले क्षण, संधी कदाचित पुन्हा कधीही मिळणार नाही.
आपण आपल्या मनाचे पाईक
लोकांपेक्षा आपल्या मनाचेच ऐक…
आयुष्य जगत असताना अनेकदा आपण स्वतः पेक्षा जास्त महत्त्व इतरांना देतो. लोकांना काय वाटेल… ते काय म्हणतील? हे स्पीडब्रेकर क्षणात आपल्या आनंदाचा वेग कमी करतात आणि आपण इतरांच्या हाती आपल्या आनंदाचा व प्रत्येक कृतीचा रिमोट देऊन बसतो. घरात मोठ्या आवाजात गाणी लावली… आवाज बाहेर गेला… लोक काय म्हणतील? परीक्षेत कमी गुण मिळाले… लोक काय म्हणतील? पाहुणचार व्यवस्थित नाही झाला तर नातेवाईक काय म्हणतील? नवऱ्याची मैत्रीण घरी आली शेजारीपाजारी काय म्हणतील? पन्नाशीत जीन्स-टी शर्ट घातला, लोक काय म्हणतील? अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला रोखतात. आपल्या मनाला मनाप्रमाणे वागू देत नाहीत आणि मग आपण प्रत्येक कृती ही आपल्या समाधानापेक्षा इतरांच्या प्रतिक्रियेसाठी करू लागतो. बेचव आयुष्याला आपण कवटाळून बसतो. परंतु आपल्या लक्षात हे येत नाही की तुम्ही काहीही करा लोक बोलणारच आहेत. मग ते चांगले असो वा वाईट.
एका अत्तराच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानाबाहेर फलक लावला होता. त्यावर लिहिले होते- “इथे सुगंधित अत्तर मिळेल.’ एके दिवशी एक ग्राहक त्याच्या दुकानात आला आणि त्याला म्हणाला, “या बोर्डवरील ओळी मला नाही पटल्या. अत्तर हे सुगंधितच असते दुर्गंधित नसते. तेवढा सुगंधित शब्द काढून टाका.’ दुकानदाराने त्याचे ऐकले. आता त्या फलकावर “इथे अत्तर मिळेल’ एवढेच शब्द होते.
त्यानंतर काही दिवसांनी एक ग्राहक आला व दुकानदाराला म्हणाला, “हा कसला फलक लावलाय, यात इथे लिहायची काय गरज आहे. तुमचे दुकान इथेच आहे ना, मग अत्तरही इथेच मिळेल. तेवढा “इथे’ शब्द काढून टाका.’ त्याने त्या ग्राहकाचे ऐकले आणि “अत्तर मिळेल’ एवढाच शब्द ठेवला.
एके दिवशी एक गृहस्थ अत्तर खरेदीसाठी आले आणि दुकानदाराला म्हणाले, “अत्तर मिळेल असे का लिहिले आहे? अत्तराच्या दुकानात अत्तर नाहीतर काय दूध मिळेल? तो फलक काढून टाका.’ त्या गृहस्थाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने तो फलक काढून टाकला. आता कसलाही फलक दुकानावर नव्हता. हळूहळू त्या दुकानात ग्राहक येणे कमी झाले. दुकानदार चिंतित झाला. एके दिवशी त्याचा मित्र त्याला भेटायला आला आणि त्याला म्हणाला, “तू किती मूर्ख आहेस.
एवढे मोठे अत्तराचे दुकान उघडलेस परंतु साधा फलक नाही लावलास?’ त्या दुकानदाराने आपल्या मित्रास सारी हकीकत सांगितली. हकीकत ऐकताच मित्र जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, “अरे लोकांना काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचे आहे. शेवटी तोटा लोकांचा नाही झाला, तुझाच झाला. झालेली चूक दुकानदाराच्या लक्षात आली आणि त्याने पुन्हा फलक लावला.
आपणही बरेचदा लोकांच्या म्हणण्याला किंवा मताला अधिक महत्त्व देतो. परंतु त्यांचे मत हे नेहमीच आपल्या हिताचे असेलच असे नाही. लोक दोन्ही बाजूने बोलतात. आपल्या मुलांचा लाड करायचा म्हटला तर, “फारच डोक्यावर बसवलंय मुलाला, म्हणून रिकामे होतात.’ याउलट हाणून मारून शिस्त लावायची म्हटली तर, हाणून मारून मुले अधिकच बिघडतात, असेही म्हणायला मोकळे.
सागर ननावरे