पाटणा- करोनाच्या काळात आपण सगळ्या जगाचे हाल पाहिले आहेत. पाकिस्तानात काय झाले ते सगळेही आपण टीव्हीवर पाहिले. त्यामुळे आता तुम्ही जिवंत आहात ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा आहे, असे वक्तव्य बिहारचे महसूल मंत्री रामसूरत राय यांनी केले आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात एका जनसभेत ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी कोविड लसीचा शोध लावला नसता आणि ती लस मोफत दिली नसती तर तुमच्यापैकी कोणीही आज जिवंत राहीले नसते असे राय यांनी म्हटले असून त्यांच्या भाषणाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. करोनाची पहिली लाट सौम्य होती. मात्र दुसऱ्या लाटेत कोणाच्या कुटुंबातील सदस्य, कोणाचा मित्र, कोणाचा नातलग यांचा मृत्यू झाला आहे असेही राय यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की विकासाची कामे झाली आहेत व विकास झालाही पाहिजे.
सरकारे व्यवस्थेच्या अंतर्गत चालतात आणि आपले सरकार हळूहळू काम करते आहे. अगोदर लोकांच्या जिवाची आणि मालमत्तेची सुरक्षा केली जाते. त्यानंतर जे पैसे वाचतात त्यातून विकास केला जातो. गेल्या दोन तीन वर्षांत करोनामुळे स्थिती बिघडली आहे. बऱ्याच देशांची परिस्थिती वाईट आहे. सगळ्यांनी पाकिस्तानात काय सुरू आहे ते टीव्हीवर पाहिले आहे. मात्र तरीही भारतातील लोक शांततेत जगत आहेत.