नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी आर्थिक पॅकेजचा पाचवा आणि अंतिम हप्ता जाहीर केला. यावेळी जेव्हा त्यांना प्रवासी मजुरांविषयी विचारले गेले तेव्हा त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आणि हे सर्व नाटक असून कृपया राजकारण करू नका, अशी विनंती त्यांनी राहुल गांधीना केली.
‘रस्त्यावर मजुरांना भेटून ही राजकारण करण्याची ही वेळ नाही. मी कॉंग्रेस अध्यक्षा सोनियाजी यांना अधिक जबाबदारीने वागावे अशी विनंती करत आहे. यावर राजकारण करू नका, असे अर्थमंत्री म्हणाल्या. शनिवारी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रस्त्यावर जाऊन मजुरांशी चर्चा केली.
पत्रकार परिषद दरम्यान अर्थमंत्री म्हणाले, मला विरोधी पक्षांना सांगायचे आहे की, आपण सर्वांनी एकत्र येऊन स्थलांतरितांच्या मुद्दय़ावर काम केले पाहिजे. यासंदर्भात आम्ही राज्यांशी जवळून काम करत आहोत. मला हात जोडून सोनिया गांधींना सांगायचे आहे की आपण आपल्या मजुरांसोबत अधिक जबाबदारीने बोलावे. कॉंग्रेस शासित राज्ये प्रवासी कामगारांसाठी जास्त गाड्यांची मागणी का करीत नाहीत? असा प्रश्न देखील सीतारमण यांनी उपस्थित केला.
प्रवासी कामगारांसाठी त्यांचे सरकार अत्यंत गंभीर आहे. सरकार आपल्या पातळीवर कोणतीही कसर सोडत नाही, तरीही मजूर रस्त्यावर जात आहेत, याचे दु: ख असल्याचेअर्थमंत्री म्हणाल्या.
राहुल गांधींनी शनिवारी दिल्लीत स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर बसले. यावर अर्थमंत्री म्हणाले, जेथे जेथे कॉंग्रेसचे राज्य सरकार आहे तेथे मजुरांना बोलवावे, सुविधा द्यावी आणि घरी पोहचावे. त्यांनी पाहिजे तितक्या गाड्यांची मागणी करावी. जेव्हा प्रवासी मजूर जात असतात तेव्हा राहुल गांधी त्यांच्या शेजारी बसून बोलत असतात. वेळ वाया घालवत का बसले आहेत, त्यांनी एकत्र चालले पाहिजे. हे सर्व नाटक आहे. आम्ही बर्याच राज्यांना सहकार्य करीत आहोत.