मध्यम कंपन्यांही दोन-तीन महिने ठेवणार “जैसे थे’ स्थिती
लहान कंपन्या स्वीकारताहेत पूर्णपणे व्हर्च्युंअल मॉड्यूल
पिंपरी – करोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. परंतु आयटी क्षेत्राने मात्र वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबवत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व उद्योग-व्यवसाय सुरू झाले. आयटी कंपन्यांनाही 50 टक्के मनुष्यबळ क्षमतेने काम करण्याची परवानगी मिळाली. परंतु अजूनही 80 आयटीयन्स वर्क फ्रॉम होमच करत आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या शेकडो आयटी कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक आयटीयन्स काम करत आहेत. अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु दहा ते तीस टक्केच मनुष्यबळ कंपन्यांमध्ये येत आहे. करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ कार्यालयात ठेवण्याचा मानस कंपन्यांनी व्यक्त केला आहे. जगभरात करोनाने थैमान घातले असल्याने आयटी कंपन्यांच्या कामाचा वेग मंदावला होता. अनलॉकच्या काळात आयटी क्षेत्राच्या कामाला काहीशा संथगतीने वेग येऊ लागला आहे.
भाड्याची जागा सोडली
काही लहान आयटी कंपन्यां (शंभरहून कमी कर्मचारी असलेले) आता शंभर टक्के व्हर्च्युअल मॉड्यूलकडे वळल्या आहेत. करोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीनंतर कर्मचाऱ्यांकडून घरातूनच काम करून घेणे लहान कंपन्यांना फायदेशीर ठरत आहे.
भाड्याची रक्कम, वीज बिल व इतर खर्च परवडत नसल्याने अनेक लहान आयटी कंपन्यांनी भाड्याने घेतलेली जागा रिकामी केली आहे. या कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगत असल्यामुळे अशा कंपन्या सध्या तरी लवकर सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
मध्यम व मोठ्या कंपन्या
लहान कंपन्यांप्रमाणे शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या मध्यम व मोठ्या कंपन्या देखील अजून पूर्वपदावर आलेल्या नाहीत. काही मध्यम कंपन्यांनी पुढील किमान दोन ते तीन महिने वर्क फ्रॉम होम वरच भर देण्याचे ठरविले आहे. बड्या कंपन्याही रिस्क घेण्यास तयार नाहीत. 50 टक्के मनुष्यबळ कार्यालयात बोलविण्याची परवानगी असतानाही केवळ वीस ते तीस टक्के लोकांनाच बोलविले जात आहे.
फायद्याची संकल्पना
करोनाकाळातही आयटी क्षेत्राचे काम सुरू होते. इतर क्षेत्रांइतके नुकसान झाले नसले तरी आयटी कंपन्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. अशा काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आयटी कंपन्यांसाठी फायद्याची ठरली. या संकल्पनेमुळे कंपन्यांचा दर महिन्याला होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे. यात प्रामुख्याने ट्रान्सपोर्ट, वीज बिल, कॅफेटेरिया, नाइट अलाउंस हे खर्च वाचत आहेत. यामुळे करोनामुळे झालेल्या नुकसानीत वर्क फ्रॉम होमची संकल्पना काही कंपन्यांसाठी बचत करणारी ठरली आहे.
बहुतेक कंपन्यांमध्ये अजूनही पूर्णक्षमतेने काम सुरू झाले नाही. सरकार आणि प्रशासनाने करोनाच्या बाबतीत दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आयटी कंपन्या काम करत आहेत. काही लहान कंपन्यांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम वर भर दिला आहे. तर मध्यम कंपन्यांमध्ये वीस ते तीस टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. पुढील दोन ते तीन महिने अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
– विद्याधर पुरंदरे, उपाध्यक्ष, सॉफ्टवेअर एक्सपोर्ट असोसिएशन पुणे