शिवेंद्रसिंहराजे भोसले; बोंडारवाडी, महू-हातगेघर प्रकल्प आगामी काळात मार्गी लावणार
सातारा – गेल्या 10-15 वर्षांत सातारा-जावली मतदारसंघात विकासकामे करून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विरोधी बाकावर बसून मतदारसंघातील मोठमोठे प्रश्न सोडवता येणार नव्हते म्हणूनच मतदारसंघाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला.
महु-हातगेघर, बोंडारवाडी धरण, तसेच अत्युच्चम दर्जाचे रस्ते असे अनेक प्रश्न आगामी काळात मार्गी लावणार आणि भाजपच्या माध्यमातून जावलीचा कायापालट करणार, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सायगाव गणात शिवेंद्रसिंहराजे यांचा झंजावाती प्रचार दौरा झाला. मेरुलिंग, मोरघर, दुदुस्करवाडी, दरे, जावळेवाडी, येरुणकरवाडी, पवारवाडी, प्रभूचीवाडी, रायगाव, महामूलकरवाडी, आनेवाडी, सायगाव आदी भागात शिवेंद्रसिंहराजे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रचार दौऱ्यादरम्यान सायगाव येथे भव्य युवक संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जावली पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, सदस्य सौरभ शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सरपंच अजित आपटे, रवी परामणे, प्रशांत तरडे, मच्छिंद्र क्षीरसागर, दादा पाटील, अंकुश शिवणकर, मच्छिंद्र मुळीक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्याच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने स्वतःच्या गटातील साधे रस्ते केले नाहीत, तर ते तालुक्याचा विकास काय करणार? आतापर्यंत सहा पक्ष बदलून झाले आहेत. त्यांनी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. जिल्हा परिषदेचा राजीनामा देऊन विधानसभेसाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यानंतर उद्याचा जिल्हा परिषदेचा सर्वसामान्य उमेदवार कोण? हे त्यांनी जाहीर करावे. अशा संधीसाधू व पदासाठी हपापलेल्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून पुन्हा घरी पाठवा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
सुहास गिरी म्हणाले, राजघराण्यातील असूनही बाबाराजेंनी राजेपणाचा कधीही आव न आणता ते नेहमीच सर्वसामान्यासारखे वागले आहेत.राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी योग्यवेळी लोकांसाठी वेगळा आणि चांगला निर्णय घेतला आहे. गैरसमजुतीतून कोणीही शंका न ठेवता विकासाच्या दृष्टीने शिवेंद्रराजेंना साथ द्या, असे आवाहन गिरी यांनी केले.
सरपंच अजित आपटे यांनी प्रास्ताविक केले. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी सभापती सौ. जयश्रीताई गिरी, माजी उपसभापती जयदीप शिंदे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नारायण शिंदे, बबनराव चव्हाण, योगेश गोळे, वीरेंद्र शिंदे, संजय निकम, प्रतापगड कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र फरांदे, बाळासाहेब मोहिते, भाऊसाहेब गोरे, बाळासो पाटील, जयदीप शिंदे यांच्यासह सायगाव गणातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…तर भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्री झाले असते
स्व. भाऊसाहेब महाराज सहकार मंत्री असताना साताऱ्यासह जावली तालुक्यातील अनेक वाडी व वस्त्यांच्या विकासाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यांनी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. भाऊसाहेब महाराज प्रामाणिकपणे राष्ट्रवादीमध्ये राहिले. पदासाठी योग्य असतानाही राष्ट्रवादी पक्षाने महाराजांना डावलले. तेव्हा कॉंग्रेसमध्ये राहिले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते व जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता, अशी खंतही शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.