अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. यावरून लगेचच टीकाकारांना तोंड फुटले. म्हणे त्याने निवृत्त व्हावे, त्याचे युग संपले वगैरे बाजारगप्पाही सुरू झाल्या. मात्र, याच सोकॉल्ड टीकाकारांना सांगावेसे वाटते की, धोनी प्रेरणास्थान होता, आहे व कायम राहणार.
फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनंट’, असे क्रिकेटमध्ये म्हटले जाते ते खोटे ना1ही. एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीत यशापयशाचे चढउतार येतच असतात. यशस्वी झाला की खांद्यावर घ्यायचे व अपयशी ठरला तर थेट खांदाच द्यायचा, ही भारतीय मानसिकता झाली. पण भारताबाहेरचे धोनीची प्रशंसा करणारे परदेशी क्रिकेटपटू त्याच्या आताच्या कामगिरीवर बोलत नाहीत, तर त्याने रांचीसारख्या भागातून पुढे येत भारतातील करोडो खेळाडूंना प्रेरणा दिली, त्याचे कौतुक करतात. हे आपल्याकडच्या स्वतःला जाणकार म्हणवणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. 2004 सालापासून धोनी भारतीय संघाकडून खेळत आहे. तसेच 2008 सालापासून आयपीएल स्पर्धेतही आपल्या कामगिरीची प्रगतीही सिद्ध करत आहे. यंदाचे वर्ष त्याच्यासाठीच नव्हे तर चेन्नई संघासाठीही अपयशी ठरले. पण लगेच गळा काढण्याची गरज नाही. त्याने आपल्या कामगिरीने संघाला तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. इतकेच नव्हे तर भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजारांपेक्षा तर एकदिवसीय सामन्यांत 10 हजारांपेक्षा जास्त धावा करणारा, हा खेळाडू एका आयपीएल स्पर्धेतील अपयशाने बदनाम केला जातो याची खंत वाटते.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व आयपीएल स्पर्धेत पुढील काही वर्षे खेळतच राहणार, असेही जाहीर केले होते. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेले नव्हते. म्हणजेच जवळपास दीड वर्षांनंतर त्याने मैदानात पाऊल ठेवले. इतक्या मोठ्या कालावधीनंतर सरस कामगिरी करणे धोनीच नव्हे तर कोणालाही शक्य नसते. “अटॅक इज द बेस्ट वे टू डिफेन्स’ हेच तत्त्व घेऊन त्याने आपली संपूर्ण कारकीर्द गाजवली, हे कोणीही नाकारणार नाही.
धोनी ऊर्फ माही रांची या झारखंडमधील भागातून आला. त्याने कोणाच्याही वशिल्याने नव्हे तर आपल्या कामगिरीने संघात स्थान मिळविले, टिकवले व कायमही राखले. पहिल्याच परदेश दौऱ्यावर म्हणजेच पाकिस्तानात झालेल्या मालिकेत पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनीच त्याच्या केशरचनेचे कौतुक केले होते, तेव्हाच त्याची लोकप्रियता किती वाढली आहे याचा दाखला मिळाला होता. त्यावेळच्या भारतीय संघात सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण असे स्टार असतानाही धोनी झाकोळला गेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या 183 धावांच्या खेळीने त्याच्यातला बेस्ट फिनिशर जगालाही दिसला.
सचिनमुळे क्रिकेट, सानियामुळे टेनिस, आनंदमुळे बुद्धिबळ, धनराजमुळे हॉकी, गगनमुळे नेमबाजी भारतात प्रसिद्ध झाली. तळागाळापर्यंत पोहोचली व त्यातून प्रेरणा घेत अनेक नवोदित स्टार पुढे आले असे म्हटले जाते. तर त्यात आणखी एका वाक्याची भर घातली गेली पाहिजे. आपणही एखाद्या छोट्या गावातून आलो तरीही देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो, यशस्वी होऊ शकतो हा विश्वास खेडापाड्यातील खेळाडूंना धोनीने दिला. सर्व सुविधा असताना कामगिरी करणे आणि सगळ्याचीच वानवा असताना कामगिरी करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. जर धोनी पुढे येऊ शकतो तर मी का नाही, हा प्रश्न त्याने नवोदितांसमोर निर्माण केला व त्यातूनच प्रेरणा घेत कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, शुभमन गील, देवदत्त पडीक्कल, प्रियम गर्ग, रायम पराग, शिवम दुबे, प्रवीण दुबे, महंमद सिराज हे व असे शेकडो खेळाडू धोनीकडून प्रेरणा घेत पुढे येत आहेत.
यंदाची आयपीएल स्पर्धा सोडा. ती काय जागतिक स्पर्धा नाही, पण त्यातील अपयशावरून जर धोनीची गुणवत्ता तपासली जणार असेल तर ती तपासणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडीच आहे. ज्या खेळाडूने मातीच्या गोळ्याला आकार देत जोगिंदर शर्मासारखे विजेते घडवले त्याच्या शिल्पकलेचे कौतुक अचानक थांबते व टीका सुरू होते याचे आश्चर्य वाटते. खरगपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनिसाची नोकरी करणारा हा खेळाडू देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनू शकतो हीच प्रेरणा घेत आज देशातीलच नाही तर परदेशातीलही नवोदित खेळाडू पुढे येत आहेत. खरेतर धोनीला भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात एक गोलकिपर म्हणून नावारूपाला यायचे होते. पण अचानक बदल झाला आणि तो क्रिकेटपटू बनला.
राहुल द्रविडची कारकीर्द लांबवण्यासाठी तत्कालीन कर्णधार गांगुलीने त्याला फलंदाज म्हणून संघात घेण्याबरोबरच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सोपवली. त्याच क्षणापासून भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळवण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णत्वालाही नेला. त्याची जिद्द, त्याची लढाऊवृत्ती, त्याचा शांत स्वभाव आणि त्या सगळ्यालाच प्रश्नचिन्ह लावणारी त्याची अत्यंत आक्रमक खेळी हेच कुतूहल आजही क्रिकेटप्रेमींवर गारूड बनून राहिले आहे. तो नवोदितांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान होता, आहे व कायम राहणार.
क्रीडारंग
अमित डोंगरे