मुंबई – विराट कोहलीने तीन वर्षांपूर्वी शतक फटकावण्याचा जो वेग ठेवला होता, तो आता मंदावला आहे. त्याच्याकडे क्षमता नाही असे म्हणणार नाही, पण सध्या त्याच्या कामगिरीवरून तरी असेच वाटते की, सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाचा विक्रम मोडणे कोहलीसाठी जरा कठीणच आहे, असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने व्यक्त केले आहे.
कोहली सचिनचा विक्रम मागे टाकेल का हा प्रश्न तीन वर्षांपूर्वी मला कोणी विचारला आसता तर मी क्षणातच हो म्हटले असते. मात्र, या कालावधीत कोहलीला सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश येत होते. त्याने आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 71 आंतरराष्ट्रीय शतक साकार केले. मात्र, तरीही तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून शतके फटकावण्याचा जो वेग ठेवला होता तोच आता मंदावला आहे. त्यामुळे जर त्याला सचिनच्या कामगिरीला मागे टाकायचे असेल तर शतकी खेळीत सातत्य राखणे गरजेचे आहे, असेही पॉन्टिंगने म्हटले आहे.
कोहलीकडे अद्याप खुप क्रिकेट बाकी आहे. तो अजूनही पाच वर्षे सहज खेळू शकतो. त्याचा पिटनेस तरुणांनाही लाजवणारा आहे. मात्र, सचिनची कामगिरी मागे टाकण्यासाठी त्याला तब्बल 30 शतकांची गरज आहे. हे वाटते तितके सोपे नाही. तो जर पाच वर्षे खेळला तर प्रत्येक वर्षात त्याला किमान सहा शतके नोंदवावी लागतील.
कोहली हे करणार नाही किंवा त्याची ती क्षमता नाही असे मला म्हणायचे नाही; परंतु ते प्रत्यक्षात साकार करणे खूप कठीण आहे. कोहलीची धावांची भूक कमी झालेली नाही, पण त्याचा तो टच निश्चितच कमी झाला आहे, असेही पॉन्टिंगने सांगितले.