पाच दिवसांचा आठवडा : रोजची ट्रेन पकडणे होणार अशक्य
पिंपरी – राज्य सरकारने 29 फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याची घोषणा केली आहे. याकरिता कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या कामकाजाची वेळ वाढविण्यात आली आहे. 45 मिनिटे वाढल्यास रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रोजची ट्रेन मिळणार नाही आणि त्यांना घरी यायला थेट मध्यरात्र होणार आहे. यामुळे पुणे मुंबई असा प्रवास करणाऱ्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा कामाचा आठवडा घोषित केला आहे. यामुळे दर शनिवारी आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र जाहीर केलेल्या सुट्टीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दररोज पाऊण तास जादा काम करावे लागणार आहे.
पूर्वी कामाची वेळ पावणे दहा ते सायंकाळी साडेपाच अशी होती. बाहेरगावी राहणाऱ्या आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कामातून सकाळी 45 ते 50 मिनिटे उशिराने कामावर येण्याची मुभा आहे. मात्र सायंकाळच्यावेळी कोणतीही सूट दिली जात नाही. यामुळे दररोजचे प्रवासी सायंकाळी सुटणाऱ्या डेक्कन क्वीन किंवा सह्याद्री एक्सप्रेस या रेल्वे एक्सप्रेसने प्रवास करीत होते. आता कामाची वेळ साडेपाच ऐवजी सव्वासहा वाजेपर्यंतची असणार आहे.
कार्यालयातून रेल्वे स्टेशनला येण्यासाठी 6.40 ही वेळ होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशनवर येऊन नेहमीची गाडी पकडणे शक्य होणार नाही. सह्याद्री एक्सप्रेसही सायंकाळी 5.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून सुटते. यामुळे ही गाडीही पकडणे कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही. त्यानंतर थेट 8.20 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस या गाडीने कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागणार आहे. ही गाडी रात्री साडेबारा वाजता पोहोचते. यामुळे यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ पाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
पुणे मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कामाच्या तासात वाढ झाल्याने नेहमीच्या रेल्वे गाडीने शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार नाही. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी आम्ही रेल्वेकडे करणार आहोत.
– इक्बाल भाईजान मुलाणी, अध्यक्ष-रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड (पुणे)