नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या संवेदनशील भागात अडकलेल्या हजारो मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मुहूर्त ठरला आहे. 16 मे रोजी रेल्वेच्या विशेष गाडीने 1345 विद्यार्थ्यांना पुण्यापर्यंत सोडले जाणार आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी दिल्लीत अडकून पडले होते. दिल्लीच्या संवेदनशील भागात विद्यार्थी अडकल्यामुळे महाराष्ट्र शासनाची झोप उडाली होती.
मात्र, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत नेण्याचा मुहूर्त सापडला आहे. येत्या 16 मे रोजी रेल्वेच्या विशेष गाडीने त्यांना नेण्यात येणार आहे. ही गाडी भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे अशा चार स्थानकावर थांबणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठी सोय झाली आहे. आधी ही गाडी फक्त भुसावळपर्यंत जाणार होती, हे येथे उल्लेखनीय.
महत्त्वाचे म्हणजे, या विद्याथ्रयांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील मुलांचा समावेश आहे. ही गाडी औरंगाबाद किंवा नागपूरला जाणार नाही. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु, महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्य महामंडळाच्या बसेने त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली आहे.
या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी जाता यावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करीत होते. या विद्यार्थ्यांसाठी तातडीने दिल्लीतून मुंबई किंवा पुण्याकडे रेल्वे पाठवावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.