अनिश्चिततेच्या काळात हवे धैर्य, संयम आणि सचोटी (भाग-१)
गुंतवणूक केलेल्या योजनेचा आढावा वेळोवेळी घेणे आवश्यक असते. परंतु पूर्णतः गुतंवणुकीतून बाहेर पडणे अथवा जमवलेले पैसे बचत खात्यात ठेवणे अयोग्य ठरते. कारण ज्या वेळी बाजारात नैराश्य व अनिश्चितता असते अशाच काळात केलेली गुंतवणूक मोठा परतावा भविष्यात देऊन जाते. यासाठी योग्य गुंतवणूक योजना निवडणे व त्यात आपली गुंतवणूक सुरुच ठेवणे आवश्यक आहे.
भिती आणि मोह या दोन्ही बाबी गुंतवणुकीतील भविष्यातील मोठी संधी घालवून बसतात. याचसाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. योग्य आर्थिक नियोजन आणि ठरवलेली गुंतवणूक, उद्दीष्ट व शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मार्ग निश्चितच भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकते. या सर्वांसाठी आपले गुंतवणुकीतील धैर्य, संयम व सचोटी ही स्वभावातील गुणधर्म वेळोवेळी संपत्ती निर्मितीसाठी कामास येतात.
प्रत्येक गुंतवणूकदार स्वभावानुसार मोठ्या बदलांना पटकन तयार होत नाही. शेअर बाजारातही होणारे मोठे बदल म्हणजेच होणारी मोठी पडझड किंवा मोठी वाढ या प्रत्येकवेळी गुंतवणूकदार संशयाने पहात असतो. अनेक वेळा वर्तमानपत्रारातून तसेच टीव्हीतून येणाऱ्या बातम्या गुंतवणूकदारास गोंधळून टाकताता. अशावेळी नेमके काय करावे हे समजत नाही. देशात व शेअर बाजारात मोठी अनिश्चितता असेल तर हीच ती सुवर्णवेळ ज्याची वाट अनेक गुंतवणूकदार नेहमी पहात असतात. अशावेळी गुंतवणूकदाराने मोठ्या हिमतीने केलेली गुंतवणूक सुरुच ठेवावी व शक्य झाल्यास गुंतवणूक वाढवावी.
जोपर्यंत आपली दीर्घकालिन उद्दीष्टे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत गुंतवणुकीमधून बाहेर पडणे टाळावे. अनेक वेळा गुंतवणूकदार छोट्या व मध्यम कालवधीसाठीही गुंतवणूक करत असतात. अशावेळी गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणेच योग्य गुंतवणूक साधनांची निवड करणे आवश्यक असते. यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे.