पुणे – सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्कारानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दिवंगत अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचा आज स्मृतिदिन. श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला होता. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव श्रीदेवी कपूर होते, श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. यात “दिल तो पागल है’ आणि “बागबान’ या चित्रपटांचा समावेश आहे. या दोन सुपरहिट चित्रपटांसह अलीकडच्या काळातीलही एका चित्रपट नाकारणे त्यांना महागात पडले होते.
बॉलीवूडमधील आतापर्यतचा सर्वाधिक हिट ठरलेल्या “बाहुबली’मधील शिवगामी या भूमिकेसाठी दिग्दर्शक राजामौली यांनी सर्वात प्रथम श्रीदेवी यांच्याशी संपर्क साधला होता. यासाठी त्यांनी खास मुंबईला येवून श्रीदेवी यांची भेट घेतली होती. श्रीदेवीला चित्रपटाचे कथा आणि त्यांची भूमिकाही खूप आवडली होती. तसेच श्रीदेवी दक्षिण भारतीय असल्याने त्या प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौलीच्या कामाबाबतही परिचित होत्या. यामुळे त्यांनी होकार दर्शविला.
राजामौली आनंदाने हैदराबादला परतले. परत आल्यावर त्यांनी आपल्या टीमला श्रीदेवीसाठी करार आणि तारखा निश्चित करण्यास सांगितले. कंत्राट पाठवल्यानंतर लगेचच त्यांना श्रीदेवीचा फोन आल्याने राजामौली सर्व काम सोडून मुंबईला आले. यावेळी झालेल्या बैठकीत श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी अनेक शर्ती ठेवल्या. यामुळे राजामौली यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरम्यान, “बाहुबली’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे डिस्ट्रीब्यूटर करण जोहरही श्रीदेवीला म्हणाले होते की, हा चित्रपट न केल्याने आपण मोठी चूक केली आहे. यानंतर श्रीदेवीने तिच्या एका मैत्रिणीला सांगितले की, मी खूप चांगली भूमिका गमावली. आपल्याला खूप पैसा मिळतो, पण चांगल्या भूमिका आणि चित्रपट पुन्हा पुन्हा करण्याची संधी मिळत नाही.