जळगाव, – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून “आंदोलनजीवी’ असा उल्लेख केला. हे चुकीचे आहे. भारताला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे, हे मोदींनी लक्षात घ्यावे, असे म्हणत जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यात दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जयंत पाटलांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ते जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आलेले होते. याठिकाणी पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले, “दिल्लीत शेतकरी 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण राजा ऐकायला तयार नाही. राजा आपल्या मनाचेच करतोय, हे भारतातल्या शेतकऱ्यांना रुचलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून “आंदोलनजीवी’ असा उल्लेख केला. हे चुकीचे आहे. भारताला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे, हे मोदींनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.