मुंबई : धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून शहरातल्या अनेक लघुउद्योगांचे केंद्र ही झोपडपट्टी आहे. मात्र कोरोनाने येथे शिरकाव केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पहिल्यांदा ९ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला होता. आजूबाजूचा परिसर दक्षतेचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे. या परिसरात लॉकडाऊनच्या नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी होतेय की नाही हे पाहण्याची जबाबदारी ३७ वर्षीय पोलिस उपायुक्त नियती ठाकर दवे यांची आहे.
२.३ चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीत सुमारे ८ लाख लोक राहतात. यापैकी दीड लाख लोक सध्या कंन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत, याचाच अर्थ ते आपल्या घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यांना घरीच जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातील. मुंबई पोलिस दलातले २३० पोलिस आणि शाहूनगरमधले १८० पोलिस अधिकारी सध्या धारावीत तैनात आहेत. तसेच राखीव पोलिस दलाच्या ताफ्यातील १०० पोलिसही येथे तैनात करण्यात आले आहेत.
दरदिवशी इथे नवनवीन आव्हाने आमच्यासमोर येतात, असे डीसीपी दवे म्हणाल्या. धारावीतल्या लोकांना घरात राहा असं सांगणं खूपच कठीण आहे, इथे एकमेकांना स्पर्श झाल्याशिवाय लोक चालूच शकत नाही. आम्ही कायद्याची अंमलबाजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत पण लोक ऐकायला तयारच नाहीत असंही त्या म्हणाल्या.
येथे अनेक गल्ली बोळे आहेत, प्रत्येकावर नजर ठेवणे शक्यच नाही, अशाही अडचणी पोलिसांनी सांगितल्या. त्यामुळे येथे असलेल्या संघटनेंच्या मुख्य व्यक्तींशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांच्याद्वारे या वस्तीत दररोज मराठी आणि हिंदीत सुचना केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे बिल्डिंगमध्ये व्हॉलेंटिअर देखील आहेत, तेदेखील पोलिसांना स्वत:हून मदत करत आहेत. धारावीत सार्वजनिक शौचालये आहेत, या शौचालयांचे दरदिवशी निर्जंतुकीकरण केले जात आहे.