जयपूर: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. मंगळवारी झालेल्या सभेत कॉंग्रेसने सचिन पायलट यांना आमंत्रण पाठवले होते पण पायलट येथे पोहोचले नाहीत. त्यानंतर त्यांना मंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. पायलट यांच्यासमवेत विश्वेंद्रसिंग आणि रमेश मीणा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा ठराव पार पडला.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोरोनासारख्या संकटात सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. कोरोना आल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र काम केले. आजही कोरोनाचा उद्रेक संपलेला नाही. आम्ही लोकांना वचन दिले आहे ते पूर्ण करण्याची ही वेळ आहे, असे गहलोत म्हणाले.
काही महिन्यांपासून सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात होते. आम्ही पायलट यांना अनेक संधी दिल्या पण ते सतत सरकारविरोधात ट्विट करत होते. कालपर्यंत ते भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होत, तसे झाले नाही तर ते त्यांचा नवीन पक्ष स्थापन करतील, असे देखील अशोक गहलोत म्हणाले.