मुंबई: “हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हला नको आहे. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. रातोरात झाडांची केलेली कत्तल आम्हाला मान्य नाही. मेट्रोला स्थगिती दिली नाही पण आरे कारशेडला स्थागिती दिली आहे. आरेतील झाडांचे पान सुद्धा तोडता येणार नाही. असे ठाकरे म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांचा मंत्रालयातील वार्ताहर संघाने स्वागत समारंभ आयोजित केला होता. दरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच! जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील.
मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! #SaveMetroSaveMumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019