नवी दिल्ली – लोकसभेमध्ये आज तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार सौगता रॉय आणि बहुजन प्रकाशचे खासदार दानिश अली यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ‘एव्हीएम’च्या विश्वासार्हतेबाबत जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी देशभरातून ईव्हीएमला हद्दपार करण्याची मागणी करत पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी, ‘भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला भाजप निवडणुकांमध्ये ३०० जागा जिंकेल असं जाहीर केलं होतं. भाजपला देशात ३०३ जागा मिळाल्या. असा तंतोतंत अंदाज वर्तवणे कसं शक्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सौगता रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, “गांधी हत्येच्या षडयंत्रासाठी १९४८मध्ये बंदी घालण्यात आलेल्या संघाचा प्रचारक आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणं दुर्दैवी आहे.” असं वक्तव्य देखील यावेळी बोलताना केलं.
दुसरीकडे, बसपाच्या दानिश अली यांनी देखील एव्हीएमवरून सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले. “पंतप्रधानांनी देशभरातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक एक देश एक निवडणुकांबाबत नव्हे तर एव्हीएमबाबत घ्यायला हवी होती. एव्हीएमने भाजपला लोकसभा निवडणुका जिंकण्यामध्ये मदत केली आहे.”