दिल्लीत फिरताना हेल्मेट आणि जॅकेट घालून फिरण्याची वेळ
मुंबई: दिल्ली ही देशाची राजधानी आहे. या दिल्लीत आज देशातील जबाबदार व्यक्ती गोळीबार करण्याची भाषा वापरत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आज दिल्लीत फिरताना हेल्मेट आणि जॅकेट घालून फिरण्याची वेळ आली असल्याची अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राचा आवाज म्हणून जर मला दिल्लीत पाठवले, पण त्याच दिल्लीत आज जे सुरू आहे ते चिंताजनक आहे. आज देशात विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे पण कॉलेज कॅंपसमध्ये विद्यार्थ्यांना दमदाटी होणार असेल तर हे दुर्दैवी आहे.
आज सरकारविरोधी बोलल्यावर तुम्ही देशद्रोही ठरता, हे देशाचे दुर्भाग्य आहे असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले. देशात गोळीबार करण्याचे वक्तव्य एखादा लोकप्रतिनिधी करत असेल तर आपण देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी एक समाज म्हणून कमी पडत आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.