सोमेश्वरनगर – निर्मिती क्षमता असलेल्या साहित्यिकांना समाज ओळखत नाही. तो राजकारण्यांना ओळखतो. पंतप्रधान नेहरू बर्नाड शॉ सारख्या साहित्यिकांना भेटायला सातासमुद्रापार गेले होते. साहित्यिकही पूर्वीसारख्या ज. वि. पवार, नामदेव ढसाळ कवीसारखे स्पष्टोक्ती ने वेदना मांडत नाहीत. तर ते कुणाच्यातरी वळचणीला उभे राहिले आहेत. हे साहित्य विश्वाचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे यांनी केले
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वर नगर संपादित “काव्यसमिधा” व डॉ.सुधाकर बेंद्रे लिखित “गंधाळली माती ” या स्वरचित कवितासंग्रहाचे प्रकाशन व राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार आणि राज्यस्तरीय जीवनसाधना पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. व. बा. बोधे बोलत होते.
याप्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे विशेष सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते. तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मा. राजवर्धन शिंदे, राजेंद्र जगताप, सुनील भोसले, सतीश सकुंडे, ॲड. रूपचंद शेंडकर, दत्तात्रय वायाळ, हेमंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. व. बा. बोधे म्हणाले, समाजात वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. ज.वि. पवारांसारखे वास्तववादी काव्यलेखन झाले पाहिजे. कविता ही आकाशातील वीज आहे. तिला पकडणे जीवावर बेतते. नाटककार वसंत कानेटकरांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकातील संभाजीराजे यांच्या संवादाने श्रोत्यांना त्यांनी हेलावून टाकले.
या समारंभात विशेष सत्कारमूर्ती- पत्रकार महेश जगताप ” गंधाळली माती” कवितासंग्रहाचे कवी डॉ. सुधाकर तसेच बाळासाहेब बारवकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराचे मानकरी –
जीवन आनंदगावकर (पानगळीच्या दुःखाचे ओझे कवितासंग्रह), कपिलराज नांगरे पाटील (प्रतिभावंत नवकवी), शरद अत्रे (मधुसंचय कवितासंग्रह), डॉ. संजय पाटील (प्रतिभावंत कवी), गजानन महामुनी (काव्य मंजूषा कवितासंग्रह), दिलीप पाठक (योगायोग- कादंबरी), शंकर गोखले (सावली प्रेमाची- आत्मकथन), बन्सीलाल कदम (अजब वास्तव- कवितासंग्रह)
राज्यस्तरीय जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी-
जगन्नाथ मोरे (सामाजिक), प्रा. पुष्पा कुन्ने (शैक्षणिक), सुनील पावले (सामाजिक), प्रा. श्रीकांत मलुष्टे (फोटोग्राफी – कलाक्षेत्र), प्रा. अरुण आलेवार (शैक्षणिक), पृथ्वीराज गायकवाड (कृषी क्षेत्र), संजय गावडे (आदर्श शिक्षक), नम्रता शेवाळे (आदर्श शिक्षिका), मोहिद्दिन शेख (आदर्श शिक्षक), सुनिता अष्टेकर (आदर्श शिक्षिका) इत्यादी
मान्यवरांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. संभाजी काकडे, प्रा. प्रकाश गायकवाड, संभाजी गायकवाड, अभिराज बोंद्रे ,प्रा.नंदकुमार खळदकर, स्वप्निल काकडे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत माने यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप व आभार प्राचार्य धनंजय बनसोडे यांनी केले.