अहमदनगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्या त्यावेळी अनेक पक्षातील नेते मंडळी हे भाजप मध्ये गेले होते. नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. काहींना वाटले भाजपात गेले की मंत्रीपदं मिळतात. डावपेच करायला जातात आणि तेच फसतात. काँग्रेस सोडणाऱ्यांवर आता पायरीवर उभा राहायची वेळ आली अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता विरोधकांवर केली आहे.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, कठीण काळातही आम्ही काँग्रेस सोडली नाही. म्हणून आज माझ्याकडे मंत्रीपद आहे. आपण विचारांवर ठाम राहिले पाहिजे. विरोधकांनी काँग्रेस सोडली अन् त्यांच्यावर पायरीवर उभी राहण्याची वेळ आली. डावपेच करत असताना स्वत:च फसतात.
राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजपा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात धर्माधर्मात भांडणे लावून देश रसातळाला नेण्याचे काम सुरू आहे. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढीने अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. एक रुपया पेट्रोल वाढले तरी आंदोलन करणारे भाजपवाले आज गप्प आहेत. कृषीच्या कायद्याने महागाई वाढणार आहे.