सी. एस. चेंगप्पा : वाहतूक नियमनावरून दोन विभागांत जुंपली
सदर काम रेल्वे सुरक्षा बलाचे असल्याच शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे
घोरपडी येथील रेल्वे फाटकामुळे कायमच वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त
शहर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून झटकली जातेय जबाबदारी
पुणे – कल्याणीनगर, मुंढवा परिसरातून मुख्य शहर परिसरात येण्यासाठी जवळचा रस्ता असलेल्या घोरपडी येथील रस्ता रेल्वे फाटकामुळे कायमच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकतो. याठिकाणी वाहतूक नियमानाची गरज सातत्याने व्यक्त केली जात आहे. मात्र, याठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलचे असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र, रेल्वे फाटक परिसरातील वाहतूक नियंत्रण हा पूर्णपणे राज्य शासनाचा विषय असून, ही शहराच्या वाहतूक पोलिसांचीच जबाबदारी असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त सी. एस. चेंगप्पा यांनी स्पष्ट केले.
घोरपडी रस्ता येथे असलेल्या रेल्वे फाटक परिसरातील रस्ता अरूंद आहे. त्यातच वाहनचालकांकडून रेल्वेगेट बंद झाल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे व्यापला जातो. यामुळे साहजिकच परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या परिसरात वाहतूक नियमन करण्याची गरज नेहमीच व्यक्त केली जाते. याबाबत स्थानिक नागरिकांकडूनही वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग यांच्याकडून ही जबाबदारी झटकली जाते.
रेल्वे फाटक परिसरात वाहतूक नियमन ही रेल्वे सुरक्षा पोलिसांची जबाबदारी असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येते. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाला विचारले असता, हा पूर्णपणे राज्याच्या अखत्यारितील विषय असून, त्याठिकाणी वाहतूक नियमन करणे ही पूर्णपणे पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाची जबाबदारी असल्याचे दलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे फाटक येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या पुलाच्या उभारणीला अजून बराचकाळ लागणार असल्याने याठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन अत्यावश्यक असल्याचे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
हद्दीच्या वादात नियमनात कमतरता
रेल्वे फाटक परिसर हा मुंढवा आणि घोरपडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. त्यामुळे वाहतूक विभागाकडून याठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी मुंढवा आणि घोरपडी पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या परिसरात क्वचितच वाहतूक पोलीस उपस्थित असतात. हद्दीच्या वादामुळे या परिसरात वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात. परिणामी, या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.