मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. त्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले आहे. बैठक हा आमचा दिनक्रमाचा भाग आहे. अंत्योदयचा संस्कार पक्षात असल्याने या बैठकीत चर्चा झाली. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवर महत्वाचे विधान केले आहे.
महागाई, पेट्रोलचे भाव याबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. “राष्ट्रीय सचिव म्हणून मला असं वाटतं की या महागाईवर तोडगा निघायला पाहिजे. महागाई नसली पाहिजे, सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असेच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
निवडणुका लढण्यामागे सुद्धा भाजपाचा एक हातखंडा आहे. मी मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तिथे प्रचाराला जाणार आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. “महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल अशी अपेक्षा असताना सर्वच आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला पाहिजेत,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“राज्यामध्ये सहकार अडणचणीत आहे. दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसलेला आहे. माझाही कारखाना आर्थिक नुकसानीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उस गाळप करत असताना शेतीवरील आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता उसाचे भाव वाढवले जातात तशाच प्रकारे साखरेच्या, इथेनॉलच्याही भावाबाबत निर्णय घ्यायला हवा. जे कारखाने नुकसान सहन करत आहेत त्यांच्याबाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहायला हवा. नुस्ता निवडणुकांसाठी कारखाना नसून तो शेतकऱ्यांसाठी आहे. काही बदलांनंतर कारखाने चालू राहतील. नुकसाना होणार नाही आणि राजकीय हस्तक्षेप कमी होईल,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“कदाचित काही लोकांना अशा पद्धतीने सारख उद्योगाला हाताळले आहे की त्यात नकारात्मता झाली असेल. अनेक उद्योग अडचणीत आल्यानंतर देशातील उद्योगपती ते उद्योग हातात घेतात. त्यामुळे साखर उद्योगाकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. साखर उद्योगाचे व्याज माफ केले पाहिजे. सरकारने कर्जाची हमी घ्यायला हवी. यासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.