नारायण राणे यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई : राज्यात सरकार स्थापन करून महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मंत्रालयात दालने घेतली आणि बंगले घेतले परंतु कारभार सुरू नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाविकासआघाडीवर केली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केल्यानंतर महत्वाची खाती ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात गेल्याने राणे यांनी ही टीका केली असल्याचे बोलले जात आहे.
तीन पक्ष एकत्र येणे हे गणितच चुकले आहे. या प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे वेगळी आहेत. हे तिन्ही पक्ष जनतेसाठी नाहीतर सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तसेच ही शिवसेनेची सत्ता नाहीतर ही राष्ट्रवादीची सत्ता आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
खातेवाटप अगोदरच राजीनामा देण्याची सुरूवात झाली होती. हे सरकार अल्पकालावधीचे असून ते दोन महिने देखील टिकेल की नाही याबाबत शंका आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक टक्का देखील महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अभ्यास नाही. त्यांचा कोणताही वचक नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देतो म्हणाले, जीआर काढला त्या जीआरमध्ये केव्हापासून कर्जमाफी देणार? ही तारीख नाही. याला जीआर म्हणत नाही ही फसवाफसवी आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.