शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
सांगली : राज्यातील पुरपरिस्थिती आता हळुहळु पुर्ववत होण्याच्या मार्गावर आहे कारण कालपासून पावसाचा जोरही कमी झाला आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनीही पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावरून सध्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या पुरग्रस्तांना केलेल्या मदतीवरून राजकारण सुरू झाले आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. लोकांना त्रास होतोय. हे सांगणे म्हणजे राजकारण नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पूरग्रस्तांना चांगली घरे बांधून द्या, अशी मागणीही पवार यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांना केलेल्या मदतीचे राजकारण करू नका असे म्हटले होते. त्यावर आता शरद पवार यांनी फडणवीसांवर टीका केली. तसेच गिरीश महाजनांवरही नाव न घेता टीका केली. पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय? पूरग्रस्तांच्या हाताला आता काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. रोजगार हमी किंवा तत्सम योजनांवर लोकांना पाठवून त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. पूरग्रस्तांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकेल असेही पवार यांनी यावेळी म्हटले.