प्रा. डॉ. संजय चोरडिया : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून अपेक्षा
पुणे – करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे युरोपसह इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तेथील विद्यार्थी मोठ्या संख्येने भारतात परतत असून, आपले उर्वरित शिक्षण भारतामध्ये पूर्ण करू इच्छित आहेत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ठोस शिक्षण धोरण बनवायला हवे, अशी अपेक्षा सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली.
डॉ. चोरडिया म्हणाले, अमेरिका आणि युरोप खंडात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे तेथील शिक्षण संस्थांचे कामकाज पूर्णपणे बंद आहे. तेव्हापासूनच या देशांतील भारतीय विद्यार्थी मायदेशात पोहोचायला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थी आपापल्या देशात परतले आहेत, तर अजूनही काही विद्यार्थी भारतात परतण्याच्या तयारीत आहेत. करोनाचे हे महाभयानक संकट कधीपर्यंत राहील, हे सांगणे कठीण आहे. शिवाय, करोनाचा धोका कमी होऊन लॉकडाऊन संपले तरी शिक्षण संस्था कधीपासून सुरू होतील याबाबत साशंकता आहे.
विद्यार्थ्यांची ही परिस्थिती बघता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, विविध राज्य सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, देशातील विविध नामांकित विद्यापीठ या सगळ्यांनी एकत्रित बसून शिक्षणतज्ञांशी चर्चा करून एक चांगले शैक्षणिक धोरण बनवायला हवे. यातून परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल. परदेशांमध्ये तीन वर्षाचा कोर्स करणारे विद्यार्थी त्यांचे दोन वर्ष पूर्ण करून आले आहेत आणि एक वर्ष बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांना भारतामध्ये हे उरलेले शिक्षण पूर्ण करता यावे, याबाबत निर्णय घ्यावा.
“विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी बघून आणि त्यात्या विद्यापीठांमध्ये त्यांचे किती क्रेडिट पूर्ण झाले आहेत आणि किती बाकी आहेत याचा विचार करून त्यांच्या शिक्षणाचा स्तर निश्चित करावा. भारतातील विविध विद्यापीठात चालणारे अभ्यासक्रम शिकण्यासाठी त्यांना विविध महाविद्यालयांमध्ये संधी दिली जावी.
यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या हितासाठी करून घेता येईल. त्यामुळे सरकारने याबाबतीत ठोस धोरण बनवल्यास हे शक्य होऊ शकते. असे झाले तर आपले शिक्षण आणि करियर याबाबतीत चिंताग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.