कोपरगाव (प्रतिनिधी) -कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा मोठा अनुशेष बाकी आहे. त्यामुळे यापुढे विकासकामांना पहिले प्राधान्य देणार असून, ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव पाठवावेत. मतदार संघातील या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. काळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनसूयाताई होन होत्या. आ. काळे म्हणाले, निवडणुकीपुरते राजकारण व त्यानंतर समाजकारण हा काळे परिवाराचा आदर्श सोबत घेऊन वाटचाल करीत आहे.
कोपरगावच्या जनतेने अशोकराव काळे यांना दहा वर्षे सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावले. त्यानंतर ग्रामीण भागाचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याचा पाठपुरावा केला. त्याचे हे फलित असून, ज्याप्रमाणे शहाजापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला, त्याप्रमाणे इतर गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीचे गटनेते अर्जुनराव काळे, गौतम बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, सिकंदर पटेल, रोहिदास होन, राहुल जगधने, बाबासाहेब वाबळे, भाऊसाहेब वाबळे, भास्करराव वाबळे, विठ्ठल वाबळे, पांडुरंग ढोमसे, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, शिवाजी वर्पे, मच्छिंद्र देशमुख, सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, उपअभियंता यू. सी. पवार, शाखा अभियंता ए. पी. वाघ उपस्थित होते. प्रास्तविक राजेंद्र ढोमसे यांनी केले.