गुवाहाटी – पगार घेणारा नोकरदार जर त्याच्या कर्तव्यावर असताना मरण पावत असेल तर त्याला शहीदाचा दर्जा दिला जाउ शकत नाही अशी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकल्यामुळे आसाममधील एक 48 वर्षीय लेखिका शिखा सरमा अडचणीत आल्या असून त्यांना देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.
शिखा यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गुवाहाटीचे पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी म्हटले असून अटक केल्यानंतर शिखा यांना आजच न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिखा सरमा या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात आणि त्यांची मते मांडत असतात. जो नोकरदार पगार घेतो तो त्याच्या कर्तव्यावर असताना मरण पावला तर शहीद मानता येत नाही. हाच न्याय लावायचा ठरला तर वीज मंडळाचे जे कर्मचारी नोकरीवर असताना विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडतात त्यांनाही शहीदाचा दर्जा मिळायला हवा असे त्यांनी म्हटले होते.
त्यांच्या या पोस्टमुळे संतप्त पडसाद उमटले व गुवाहाटीतील दोन पत्रकारांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हा आपल्या सैनिकांचा घोर अपमाना असून त्यांच्या बलिदानाची तुलना पैशांशी केली जात असल्याचे त्या तक्रारींमध्ये म्हटले आहे.