पणजी- गोवा निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, परंतु आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेससारख्या नवख्या पक्षांना येथील नागरिक थारा देतील असे वाटत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले आहे.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना पायलट म्हणाले की, 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर गोव्यात कॉंग्रेस सरकार स्थापन झालेले दिसेल. पैशाचा वापर करणे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची शिकार करणे असे डावपेच राजकारणात दीर्घकाळ चालत नाहीत. त्यामुळे भाजप किंवा अन्य पक्षांनी असे काहीही उपाय योजले तरी राजकीय पक्षाची पार्श्वभूमी महत्त्वाची असते आणि मतदार ते पाहूनच आपला कौल देणार असल्याने गोव्यात कॉंग्रेसला चांगली संधी आहे असे ते म्हणाले. भाजपने मागच्या निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेस व अन्य पक्षांचे आमदार फोडून येथे सरकार स्थापन केले, पण त्यांची ही उठाठेव फक्त सत्तेसाठीच होती. त्यांच्या पक्षाच्या सरकारमुळे गोव्यातील जनतेचे काहीच भले झाले नाही ही बाब गोव्यातील नागरिकांना चांगलीच माहिती आहे असेही त्यांनी म्हटले आहे.