दहन, की दफन या वादात पडण्यापेक्षा तातडीने अंतिम संस्कार गरजेचे : तज्ज्ञ
पुणे (श्रीनिवास वारुंजीकर) -करोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरातील 7 लाख 87 हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर या विषणूची लागण झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या 37 हजारहून अधिक झाली आहे. अशातच आता ब्रिटनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ब्रिटनच्या वेस्टर्न मिडलॅंडमधील एका 86 वर्षीय महिलेचा करोनाची लागण झाल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला. या महिलेच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या एकाच कुटुंबातील 17 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाची लागण मृत व्यक्तीच्या शरीरामधूनही होत असल्याचे निष्पन्न झाले असून आता करोनाबाधित व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह भारतीय पद्धतीने अग्निच्या स्वाधीन करायचा, की मातीमध्ये दफन करायचा, यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार करोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यविधी हा कमीत कमी लोकांमध्येच करावा. मृत व्यक्तीचे शरीर पूर्णपणे झाकलेले असावे. जेणेकरून कोणाला संसर्ग होणार नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह नेणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. अंत्यविधीला उशीर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अंत्यविधी झाल्यावर सर्वांनी आपले शरीर स्वच्छ करावे. संसर्गाचा धोका वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बै. जी. शासकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, पुणे
“करोना’ संसर्गाने कोणाचा मृत्यू झाला, तर सर्वाधिक सुरक्षित उपाय म्हणजे त्या मृतदेहाला अग्नि देणे हाच आहे. चीन, अमेरिका, स्पेन आणि इटलीतही धार्मिक विषय पुढे न आणता, अशा मृतदेहांना अग्नि दिला जात आहे. जर अग्नि देणे शक्य नसेल, तर अशा मृतदेहाच्या दफनाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मृतदेह कापडात (कफन) न गुंडाळता, त्यासाठी विशिष्ट पॉलिथीनची बॅग वापरणे गरजेचे आहे. अशा मृतदेहावर धार्मिक विधी न करता लवकरात लवकर दफन आवश्यक असते. मृतदेहाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्रावांमधूनही करोना पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दहन अथवा दफनविधी निवडक लोकांनी करताना स्वत:चे शरीर झाकणे आवश्यक आहे. नुकताच मुंबईच्या एका एका रुग्णालयाच्या शवागारात असा एक मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आला होता. सरकारने अशा गोष्टींकडे तातडीने लक्ष द्यावे. शिवाय अशा व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला गर्दी करणेही जीवावर बेतू शकते, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
“करोना’ बाधिताचा मृत्यु झाल्यानंतर अशा व्यक्तीचा मृतदेह दहन करणे, हेच सर्वाधिक वैज्ञानिक असल्याचे दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही दहनाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. माणसाच्या शरिरातील सर्व अवयव हे 109 डिग्री तापमानाला पूर्ण ज्वलन होतात आणि मग कोणत्याही प्रकारचे जेनेटिक मटेरियल (लाळ, त्वचा, रक्त इत्यादी) या दहनानंतर शिल्लक राहू शकत नाहीत. त्यामुळे कोणत्याही धार्मिक वादामध्ये न पडता, प्रत्येकाला जर या रोगाच्या बाधेपासून वाचायचे असेल, तर दफनाऐवजी दहन करणे सर्वात श्रेयस्कर आहे, असे सुचवावेसे वाटते. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्याही भारतीय दहनाची पद्धतच सर्वांत स्वीकारार्ह आहे, हे नक्की!
– डॉ. अमित भस्मे, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ, पुणे
ज्यावेळी संसर्गजन्य आजाराने एखाद्याचा मृत्यू होतो, त्यावेळी पेशंटच्या नाका-तोंडात नळ्या असतात, युरिन बॅगही असते. असे मृतदेह शक्यतो अग्निच्या स्वाधीन करावेत. मात्र, दफनच करायचे असतील, तर शरिराला जोडलेल्या कोणत्याही नळ्या, तसेच नाका-तोंडातून कसलेही लिकेज होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सोडियम हायपोक्लोराइड वापरुन पॉलिबॅगमध्ये मृतदेह सील करावा आणि मगच दफन करावे. कब्रस्तानामधील कर्मचाऱ्यांनीही मास्क व ऍप्रनचा वापर करावा. दहन केल्यानंतर रक्षा गोळा करतानाही योग्य ती काळजी घ्यावी. अंतिम संस्काराच्या पद्धतीपेक्षा, अंतिम संस्कार करणाऱ्यांनी सर्वाधिक काळजी घ्यावी.
– डॉ. संजय पाठारे, मेडिकल डायरेक्टर, रुबी हॉल क्लिनिक, पुणे