कोणत्याही शाळेच्या सभोवती नजर फिरवली तर गुबगुबीत गालांची मुलं हमखास तुमच्या नजरेस पडतात. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. बालकांच्या वजनासंबंधीच्या समस्यांना अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात साखरसेवन सर्वाधिक जबाबदार आहे. केवळ प्रौढ म्हणून आपल्या साखर सेवनाच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं पुरेसं नाही, मुलांच्या साखर सेवनावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
आपण पालक म्हणून, प्रामुख्याने महिलावर्ग आपल्या मुलांना गरजेपेक्षा जास्त भरवतात. लठ्ठ मूल सशक्त असतं, असा गोड गैरसमज आपल्याकडे रूढ आहे. बालकाची अंगकाठी सडपातळ असेल तर असं मूल अशक्त मानलं जातं. बऱ्याचदा अशा मुलांना कुपोषितही ठरवलं जातं. उलट गलेलठ्ठ मूल म्हणजे खात्या-पित्या घरातील लेकरू अशी भाबडी समजूत लोकांच्या मनात असते. वजन हीच एक समस्या ठरू शकते याबाबत मुलं अनभिज्ञ असतात. त्यामुळे आवडते सर्वच पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल असतो. साखरेचा मुद्दा येतो, तेव्हाही तिचे अतिसेवन करू नये, याकडे मुलांचे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच असते. मात्र ही सवय बालकांच्या वाढीत अतिशय संवेदनशील ठरते. त्यामुळे कमी वयातच विविध आजारांना आमंत्रण मिळतं.
“ओबेसिटी जर्नल’मध्ये म्हटले आहे की, साखरेमुळे वजन वाढते म्हणून ती वाईट आहे, असं नाही; तर तिच्या अतिरिक्त सेवनामुळे तुमच्यात चयापचयासंबंधी अनेक मोठे बदल घडू शकतात. वय वर्ष 9 ते 18 वयोगटातील 43 लठ्ठ मुलांवर साखर-मर्यादा पडताळून पाहिली असता किमान एका मुलाला चयापचय समस्या (उच्चरक्तदाब/रक्तातल्या चरबीचे मोठे प्रमाण) असल्याचे लक्षात आले. तसेच यकृतावर चरबी साठलेली दिसली. सुमारे नऊ दिवस या मुलांनी साखर-मर्यादा असलेला आहार घेतला, मात्र आहारातील उष्मांक स्थिर ठेवण्यात आला. त्यांना साखरेच्या बदल्यात पिष्टमय पदार्थ (स्टार्च) आणि कर्बोदके देण्यात आली. नऊ दिवसांनंतर बालकांचा सरासरी रक्तदाब कमी झाला.
यकृतावर साठलेली चरबी 33 पॉइंटनी कमी झाली, त्यांचे एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल दहा पॉइंटनी घसरले. इन्सुलिन एक तृतियांशने मंदावले. रिकाम्या पोटी शर्करा प्रमाण (फास्टिंग ग्लुकोज) आणि यकृताचे कार्य सुधारले. कॅलरी (उष्मांक) म्हणजे कॅलरी नाही’. या कॅलरी शरीरात त्या जिथे जातात तिथूनच येतात.
साखरेतील उष्मांक वाईट असतात. त्यामागचं कारण म्हणजे हे उष्मांक वजन व कमरेचा घेर वाढवतात. त्यामुळे एचडीएलची पातळी कमी होते. एलडीएल वाढतं. रक्तातील शर्करा वाढतो. चयापचय क्रिया आणि उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयरोगासंबंधीचे आजार बळावतात. शिवाय साखरेचे जास्त प्रमाण यकृताला हानी पोहोचवते. प्रत्येकवेळी जेवणानंतर साखर खाण्याची तुम्हाला सवय असेल तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती दिवसातून निम्म्याच प्रमाणात काम करेल. “यूएसए टुडे’च्या अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की, साखरेचे अतिसेवन म्हणजे तुमच्या प्रतिकारशक्तीशी केलेली गंभीर तडजोड! अशी प्रतिकारशक्ती जी तुम्हाला विषाणू, जीवाणू आणि परजीवींशी लढण्याची ताकद देते.
आरोग्यदायी पर्याय काटेकोरपणे अंगीकारणे ही काळाची गरज आहे. तुम्ही साखरेला पूर्णपणे टाळू शकत नसाल, तर सेवनाच्या मर्यादा निश्चित करा. विज्ञान फार पुढे गेलं आहे, यासाठी खरंच त्याचे आभार मानले पाहिजेत. आपल्या मदतीसाठी कृत्रिम स्वीटनर्स आहेत. सध्या बाजारात अनेक ब्रॅन्डसची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, ज्यामुळे शरीरात शून्य उष्मांक जातात आणि वजनावर नियंत्रण राहतं. केवळ मधुमेहींना साखरेपासून चार हात लांब राहावे लागते, अशातला भाग नाही. अशा पर्यायांचा नियमित वापर तोंडाच्या उत्तम आरोग्यासाठीही सुचवला जातो. कारण साखर नाही, म्हणजे दात सडत नाहीत, तुमची चवही कायम राहते. त्यामुळे शेवटी सगळ्याच परिस्थितीचा फायदा तुम्हाला होतो.
त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमची साखरयुक्त पेयं, बिस्किटं आणि केक, आरोग्यदायी नाश्ता पर्याय म्हणून खाऊ-पिऊ शकता. कायम नैसर्गिकरित्या गोड फळे म्हणजे खजूर, केळी, द्राक्षं आणि लिची किंवा बोरं हातात ठेवा. त्यामुळे तुमची साखरेची गरज नैसर्गिकरित्या पूर्ण तर होईलच; शिवाय, समृद्ध तंतुमय घटक, जीवनसत्त्वे व खनिजेदेखील मिळतील. साधारणपणे दोन-तीन तासांच्या अंतराने नियमित काहीतरी खात राहावे. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा मर्यादित राहील.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत. आरोग्यदायी प्रथिने असलेल्या घटकांचे सेवन करावे. संपृक्त ओमेगा-3, प्रथिनांचे सेवन उत्तम आहे. तुमच्या आहारात आंबवलेले पदार्थ म्हणजे दही, इडली व ढोकळ्याचा समावेश करा. या अन्नपदार्थात असलेले चांगले जीवाणू (गुड बॅक्टेरिया) अन्न पचनाला मदत करतील आणि शरीरातून विषारी घटकांचा निचरा होईल. ज्यामुळे तुमच्या यकृतावर येणारा ताण कमी होईल.
– डॉ. मानसी पाटील