१६ डिसेंबर २०१२ ला दक्षिण दिल्ली मधील मुनिर्का गावात एका २३ वर्ष मुलीवर निर्घृण बलात्कार करण्यात आला. दोषींना २० मार्च २०२० ला तिहार जेल मध्ये फाशी देण्यात आली.
या पाशवी गुन्ह्याला फाशीची शिक्षा मिळाली, पण प्रश्न हा उरतो की शिक्षा व्हायला इतकी वर्ष का लागली? का गुन्हेगारांकडून सतत माफीची, बचावाची बोली बोलली गेली? आपण केलेल्या पाशवी गुन्ह्याबद्दल काहीच पश्चाताप नाही? अरे म्हणजे तुम्हांला काही लाज शरम? पशू ही म्हणता येणार नाही तुम्हांला. मानवरूपी राक्षस हा एकच शब्द उरतो असल्यांसाठी.
देशाची न्यायव्यवस्थाही का इतकी संथ पडते अशा निर्णयांवेळी? परवाच झालेल्या हैदराबादमधल्या बलात्काराच्या गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला. पण प्रश्न हा उरतो की , हा असा तडकाफडकीचा निर्णय योग्य आहे का? आपल संविधान याला परवानगी देतं का?
मला वाटतं, बलात्काराचे निकाल लवकरात लवकर लागावेत. पूर्ण तपासणी, चौकशी योग्य त्या चाचण्या करून दोषी सिध्द झालेल्या गुन्हेगारांना भर चौकात फाशी देण्यात यावी. जेणेकरून परत असा गुन्हा करण्याच मनात येण्याआधीच मनाचा थरकाप उडेल.
हे झालं बलात्कार झाल्यानंतरचं. पण अशा अमानवी घटना घडूच नयेत म्हणून काय करता येऊ शकतं? बलात्कारी ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती रंग, रूप, समाजातल स्थान, गरिब श्रीमंत या गोष्टी पाहून जन्म नाही घेत. या प्रवृत्तीचा जन्मच न होऊ देणं महत्वाचं. यासाठी खूप मूळापासून काम केलं पाहीजेय. आणि याची सुरूवात घराघरापासून झाली पाहिजेय. स्त्री पुरूष समानता समाजात रूजली पाहिजे. स्त्रीला मन असत ते जपल पाहिजे, ती फक्त एक शरीर नाही याची शिकवण लहानपणी पासून मुलांनी दिली गेली पाहिजे. स्त्रीयांनाही आपल्या हक्कांबद्दल जागरूक केल गेल पाहिजे. स्त्री आहेस तर कर सहन, हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुली लहान असल्यापासूनच स्वरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजेत.
जोपर्यंत समाजाची मानसिकता सुधारत नाही, तोपर्यंत हे गुन्हे होतच राहणार. निर्भंयांचे जीव जातच राहणार. प्रत्येक स्त्री सुरक्षित असावी. मग ती कोणाच्याही घरची असेना.
– सई मनोज देशमाने