मुंबई : ऋषी कपूर हे आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. ट्विटवरुन राष्ट्पतींनी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईमध्ये वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपटामध्ये अजरामर भूमिका साकारणाने ऋषी कपूर हे नुकतेच कॅन्सरसारख्या रोगामधून बरे झाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकीय आणि क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांनी या हरहुन्नरी कलाकाराला श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राष्ट्रपतींच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. “ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. ते एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक हास्य असायचं. ते कायम उत्साही असायचे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करुयात. त्यांच्या कुटुंबिय आणि मित्र परिवाराचे मी सांत्वन करतो,” असं राष्ट्रपतींने म्हटलं आहे.