कोलकाता – करोना संकटातून तातडीने दिलासा मिळणे कठीण वाटते. त्या संकटामुळे उद्भवलेली स्थिती हाताळण्यासाठी तीन महिन्यांच्या अल्पमुदतीची योजना बनवणे आवश्यक आहे, अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये सहभागी झालेल्या ममतांनी मंगळवारी येथे पश्चिम बंगालच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ममतांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. देशव्यापी लॉकडाऊन सर्वप्रथम 25 मार्चला लागू करण्यात आला.
पूर्वनियोजनाशिवाय ते पाऊल उचलले गेल्याने जनतेला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सवेळी मी मोदींसमोर अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्यांच्याबरोबरच्या चर्चांनंतर आम्हाला नेहमीच रिकाम्या हातांनी परतावे लागले. मोदी सरकारने अजूनही आमच्या हक्काचे पैसे दिलेले नाहीत, अशी नाराजी ममतांनी व्यक्त केली. करोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले.
त्यामुळे राज्यांची आर्थिक स्थिती शोचनीय बनली आहे. त्यातून मोदी सरकारने जीएसटीचा परतावा द्यावा. तसेच, आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विविध राज्यांकडून वारंवार केली जात आहे.