नवी दिल्ली – लखीमपुरच्या घटनेवरून देशात पुन्हा हिंदु आणि शिख यांच्यात वादंग निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो देशासाठी धोकादायक असून जुन्या खपल्या पुन्हा खरवडून काढण्याचा हा प्रकार थांबवला जावा आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून संबोधणेहीं थांबवले जावे अशी मागणी करीत भाजपचेच खासदार वरूण गांधी यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.
लखीमपुर खेरीला गरीब शेतकऱ्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे, स्थानिक राजकारणातील प्रभावशाली व्यक्तींना हा प्रकार केला आहे, हा धार्मिक वादाचा प्रकार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या शिख समाजाने देशासाठी पिढ्यान पिढ्या आपले रक्त सांडले त्या शिख समाजाचा खलिस्तानी असा उल्लेख करणे थांबवले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे खासदार असलेले वरूण गांधी सध्या पक्षाच्या धोरणावरच टिका करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतून वगळण्यात आले आहे. परंतु तरीही त्यांनी आपली टीका थांबवलेली नाही. देशाच्या ऐक्यापेक्षा राजकारणला महत्व देण्याची गरज नाही असेही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.