कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची भूमिका
मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नये, या भूमिकेवर कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम अजूनही ठाम आहेत. राज्यातील सत्तास्थापनचे गुंता सोडवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असताना संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. राज्यात तयार होणाऱ्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनने कॉंग्रेसला महागात पडणार असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.
वर्षों पहले उत्तर प्रदेश में #BSP के साथ गठबंधन करके काँग्रेस ने गलती की थी।
तब से ऐसी पिटी कि आज तक नहीं उठ पाई।
महाराष्ट्र में हम वही गलती कर रहे हैं।
शिवसेना की सरकार में तीसरे नंबर की पार्टी बनना कॉंग्रेस को यहां दफन करने जैसा है।
बेहतर होगा,काँग्रेस अध्यक्ष दबाव में न आएं।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 21, 2019
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) जात कॉंग्रेसने मोठी चूक केली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस रसातळाला गेली. त्यातून कॉंग्रेसला आतापर्यंत सावरता आलेल नाही. महाराष्ट्रात आपण पुन्हा हीच चूक करत आहोत, अशा आशयाचे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सामील होणे कॉंग्रेसला खड्ड्यात गाठण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी दबावात येऊ नये, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
यापूर्वी देखील त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत उघडपणे विरोध दर्शवला होता. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन होऊ शकते, यासंदर्भातील चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. शिवसेना-कॉंग्रेस मिळून स्थिर सरकार महाराष्ट्रात शक्य नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. कॉंग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर भविष्यात कॉंग्रेसला अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळेच कॉंग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये, असे ते म्हणाले होते.