रोहित पवार; स्व. यशवंतरावांच्या समाधीस्थळी केले अभिवादन
कराड – राज्यात कॉंग्रेस आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आकडेवारीत जरी आघाडी मागे असली तरी लोकांचा विचार बदलत असल्याचे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. कॉंग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते प्रचारासाठी आले असते तर आघाडीच्या उमेदवारांना आणखी फायदा झाला असता, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी त्यांनी आज अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. रोहित पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे प्रेरणास्थान आहे. याआधी झालेल्या निवडणूक जिंकल्यानंतरही मी समाधी स्थळावर येऊन अभिवादन केले होते. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी दिलेल्या आशीर्वादामूळे मी निवडणूक जिंकलो. त्यामुळे राज्यातील प्रेरणास्थान असणाऱ्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी काय करायचे, याबाबत अनेकांनी मला मार्गदर्शन केले होते. त्यातील चांगल्या गोष्टींचा आचरण करुन निवडणूक जिंकली आहे. पहिल्याच विधानसभा निवडणुकीचा अनुभव चांगला होता असेही ते म्हणाले.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, चार महिन्यापूर्वी निवडणुकीत त्यांना लोकांनी निवडून दिले होते. लोकशाहीचा निर्णय मान्य करायला हवा होता. मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. त्यामुळे या निवडणुकीत लोक श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले. राज्यात कॉंग्रेस आघाडीला चांगले यश मिळाले आहे.सत्ता स्थापनेबाबत त्यांना छेडले असता त्याबाबतचा निर्णय आमचे नेते शरद पवार घेतील, असे सांगितले. कॉंग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी झाले असते तर आघाडीला त्याचा निश्चित फायदा झाला असता असेही ते शेवटी म्हणाले.