दत्तात्रय भरणे : निंबोडी येथील विकास संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
रेडा- राज्यातील सहकार तत्वावर चालणाऱ्या संस्था संस्थाचालकांनी संचालक मंडळाने जबाबदारीने चालवून सहकार टिकवण्याची जबाबदारी सरकार बरोबर आपलीही कायम ठेवावी. तरच शेतकऱ्याची प्रगती साधता येईल, असे मत सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे निंबोडी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी भरणे बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर, इंदापूर बाजार समितीचे संचालक अनिल बागल, गणेश झगडे, अमोल भोईटे, हरिश्चंद्र वणवे, सचिन सपकळ, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, सागर भोईटे, विक्रम निंबाळकर, शुभम निंबाळकर, प्रशांत पोरे, प्रकाश नेवसे, सोमनाथ दराडे, चेअरमन प्रवीण घोळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, निंबोडी गावातील शेतकऱ्यांनी मेहनतीने आपली शेती फुलवली असून, गावातील विकास संस्थादेखील त्याच मेहनतीने प्रगतीपथावर नेले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब उपेक्षित शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकार घेत आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना अधिक कसा घेता येईल या संदर्भात निर्णय घेतले जातील, अशीही ग्वाही भरणे यांनी दिली.