नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळात उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे आपल्या गरजा भागविण्यासाठी भारतातील तरुणांनी कर्जाचा आधार अधिक प्रमाणात घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेने 12 देशांतील 12,000 व्यक्तींशी संवाद साधून तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
भारतातील 44 टक्के तरुणांनी सांगितले की, या काळात आम्हाला जास्त कर्ज घ्यावे लागले. त्या तुलनेत 45 वर्षावरील व्यक्तीपैकी 28 टक्के व्यक्तींने सांगितले की, या काळात त्यांना जास्त कर्ज घ्यावे लागले.
लॉक डाऊनच्या काळात आर्थिक अडचणी वाढल्याचे जागतिक पातळीवर 64 टक्के लोकांनी सांगितले. तर भारतात हे प्रमाण 75 टक्के आहे. भारतातील 48 टक्के तरुणांनी सांगितले की, ते घर किंवा कार अशा मोठ्या खरेदीसाठी बचत करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार गमवावा लागला. त्यातल्या त्यात औपचारीक क्षेत्रातील रोजगार गमावलेल्या तरुणांची परिस्थिती अधिक खराब झाली आहे. मात्र आता राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सकारात्मक आली आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.