मनोज घोरपडे : निष्क्रिय आमदारांना जनताच घरी बसवेल
सातारा – कराड उत्तरच्या निष्क्रीय आमदारांमुळे मतदारसंघात अनेक प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही मतदार संघातील अनेक कामे मी मार्गी लावली असून जनतेने कराड उत्तरचे प्रतिनिधीत्व करण्याची सधी दिल्यास गेल्या 20 वर्षांत जे झाले नाही झाले ते पाच वर्षांत करून दाखवेन अन्यथा राजकारण सोडून देईन, अशी ग्वाही कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी दिली. म्हासुर्णे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोजदादा घोरपडे यांना मतदार संघातील प्रत्येक विभागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुसेसावळी गटातील उंचीठाणे, कातवडी, लाडेगाव, रेवली, वाझोंळी, भूषणगड,मुसांडवाडी, होळीचागाव, शेनवडी, रहाटणी, वडगाव, चोराडे, म्हासुर्णे या गावात अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांची पदयात्रा व कोपरा सभा पार पडली. यावेळी त्यांचे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले. “मनोजदादा आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.
यावेळी मनोजदादा म्हणाले, पुसेसावळी गटात गेल्या पाच वर्षात मी सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामध्ये सांगलीला जाणारे उरमोडी कालव्याचे पाणी हे चोराडे, म्हासुर्णे, शेनवडी व पुसेसावळी गटातील इतर गावासाठी आरक्षित असूनसुद्धा पोटपाट नसल्याने शेतकऱ्यांना मिळत नव्हते आणि हा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता, या कामासाठी मी निधी उपलब्ध करून दिला.
तसेच या विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावले असून भविष्यात ही पुसेसावळी गटाचा विकास करण्यासाठी प्राधान्य असेल. या विभागात आजही अनेक समस्या आहेत, पण या आमदारांना यायला वेळ नाही. कारण त्यांच्या मागे कारखान्याचा खूप मोठा व्याप आहे. त्यामुळे आमदार असूनसुद्धा ते लोकांच्या समस्या सोडवू शकत नसल्याने त्यांना यावेळी जनतेने घरी बसवायचे ठरविले आहे. यापुढे कराड उत्तरचा विकास हा झपाट्याने होईल यात काही शंका असणार नाही असेही मनोज घोरपडे म्हणाले.
पुसेसावळी विभागात सध्या अनेक शेतात बटाटा काढण्याचे काम चालू असून यावेळी मनोजदादा घोरपडे याची पदयात्रा जात असताना शेतातील शेतकऱ्यांना अभिवादन करत शिवार फेरी मारली असता त्यावेळी शेतकऱ्यांनी दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत, यावेळी आम्ही परिवर्तन करायचा निश्चय केलाय असे बोलून दाखवले जात आहे.