पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू : नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे तहसीलदारांचे आदेश
केतकावळे – मागील एक ते दीड महिन्यापासून पुरंदर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बहुतेक सर्वच पिके नष्ट झाली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पिकांचे पंचनामे करण्याची वारंवार मागणी केली होती; परंतु पिकांचे कोणतेही नुकसान झालेच नाही, अशी माहिती देणाऱ्या प्रशासनाला अखेर उपरती आली आहे.
तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी कृषी विभागाला नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना पण प्रशासनाला शहाणपण सुचले, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट या महिन्यात तालुक्यात जवळपास 20 ते 25 दिवस सलग पाऊस सुरू होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वांत महत्त्वाचे आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारे प्रमुख वाटाणा यांसह घेवडा, भुईमूग, मूग, बाजरी, भात ही पिके त्याचप्रमाणे डाळिंब, पेरू सीताफळ, या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाल्याने शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती; परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून नुकसान झालेच नाही, असा खोटाच अहवाल कृषी विभागाने तहसील कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयाकडे कळविला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला असून या पावसाने उर्वरित पिके अक्षरशः झोपली आहेत.
- डाळिंबाचा अक्षरश: सडाच पडला
सध्या शेतात बाजरीच्या पिकाची काढणी सुरू आहे. याच काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याचा प्रकार घडला आहे. वाटाणा तर पंचनामा करायलाही शिल्लक राहिलेला नाही. मूग, घेवडा, गाजर, कोथिंबीर, शेपू ही पिके पाण्याने अक्षरशः कुजून गेली आहेत. तर भुईमूग पिकाची उंची पाण्यामुळे दोन ते अडीच फूटापर्यंत गेली आहे, मात्र त्याला शेगांचे प्रमाण खूप अल्प आहे. काही भागात तर शेंगाच नाहीत. डाळिंबाचा तर जमिनीवर अक्षरशः सडाच पडला होता. याशिवाय इतरही पिके नष्ट झाली आहेत.
- सर्वाधित नुकसान कांदा रोपांचे
यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे शेतात टाकले होते. सध्या कांदा बियाणांच्या एका पायलीचा दर 8 ते 10 हजार रुपये इतका असून एवढ्या महागड्या दराने खरेदी करून बियाणे शेतात टाकले; परंतु अती पावसाने ते संपूर्ण जळून नष्ट झाले आहेत. परिणामी यंदाच्या कांदा लागवडीवर मोठा परिणाम जणवणार आहे. जवळपास 80 ते 90 टक्के कांदा रोपे जळून नष्ट झाल्याने आता पंचनामे कशाचे करणार? अनेक पिकांना शेतकऱ्यांनी कंटाळून पाळी घातली असल्याने पंचनाम्यात काय दाखविणार ? आणि नुकसान भरपाई कशी आणि कधी मिळणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.
- नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले असून लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावे. गावातील ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी पंचनामे करून घेण्याचा आग्रह धरावा.
– रुपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर तालुका