नवी दिल्ली : “कोविड-19′ विषाणूच्या प्रसारामुळे उद्योग, शेती, बांधकाम आणि इतर क्षेत्रात काम करणारे कामगार आपापल्या कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडले आहेत आणि त्यांना राज्य सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या निवारा शिबिरात ठेवण्यात आले आहे. 20 एप्रिलपासून एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर अतिरिक्त नवीन उपक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यामुळे या कामगारांना औद्योगिक, उत्पादन, बांधकाम, शेती आणि मनरेगाच्या कामांमध्ये सहभागी करून घेता येईल.
सध्या राज्यांमधील मदत शिबिरांमध्ये वास्तव्याला असलेल्या स्थलांतरित मजुरांची संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदणी करावी आणि विविध प्रकारच्या कामांसाठी त्यांची योग्यता पारखून घेण्यासाठी त्यांची कौशल्य चाचणी केली जावी. जर स्थलांतरितांच्या एखाद्या गटाला सध्या ते ज्या राज्यात आहेत, तिथल्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत जायची इच्छा असेल तर त्यांची तपासणी केल्यावर त्यांच्यात लक्षणे आढळली नाही तर त्यांना त्यांच्या संबंधित कामाच्या ठिकाणी पाठवण्यात यावे.
हे लक्षात घ्यावे की सध्या राहत असलेल्या राज्याच्या बाहेर कामगारांची ने-आण होणार नाही. बसमधून प्रवास करताना आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षित शारिरीक अंतराचे नियम पाळले जातील आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसचे निर्जंतुकीकरण झाले असायला पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासन त्यांच्या प्रवासाच्या कालावधीत अन्न आणि पाणी इत्यादी सुविधा पुरवेल, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.