जेरूसलेम – इस्रायलने अत्यंत वेगाने लसीकरण करून तब्बल 60 टक्के लोकांना करोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. आतापर्यंत इस्रायलमधील 93 लाख लोकांना फायझरची लस टोचण्यात आली आहे. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जाते.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर देशातील करोनाच्या मृत्यूदरात घट झाली. त्यामुळे आता इस्रायलमधील दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरु केले जात आहेत. मे महिन्यापासून इस्रायलमध्ये परदेशी नागरिकांनाही प्रवेश देण्यात येईल. जगात करोनाची साथ आल्यापासून इस्रायलमध्ये आतापर्यंत 8.36 लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. देशातील एकूण 6,331 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारताने काय केले पाहिजे
भारतात आतापर्यंत जेमतेम 11 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यातही दोन्ही डोस घेतले असणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे. 130 कोटी भारताची लोकसंख्या आहे. आताच्या वेगाने जर लसीकरण मोहीम सुरू राहीली तर प्रत्येकाला लस द्यायला कोणते साल उजाडेल याचे उत्तर देवालाच ठाऊक कारण सरकार त्याचे उत्तर देणार नाही.
एकीकडे लस मुबलक असल्याचे सांगण्यात येते. मात्र लस उपलब्ध नाहीच, अशी विसंगतीही आहे. त्या पार्श्वभूमीवर जी राज्ये आणि त्या राज्यातील ज्या शहरांतील स्थिती हाताबाहेर गेली आहे तेथे अगोदर लक्ष केंद्रीत करून सगळ्यांत जास्त लसीकरण केले पाहिजे. ते अत्यंत वेगाने केले पाहिजे. तरच हर्ड इम्युनिटी तयार होऊन करोनाला थोपवता येउ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप सरकारने हा सल्ला ऐकलेला नाही. अजुन 45 ची वयोमर्यादाही शिथिल केलेली नाही. ते पाहता सगळेच अवघड होउन बसणार असल्याचे आजचे तरी चित्र आहे.