इस्लामपूर (प्रतिनिधी) : लहान भावाने टीव्हीचे चॅनेल बदलले या रागातून बहे (ता. वाळवा) येथील आर्यन दिनकर पाटील (वय १३ ) या शाळकरी मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. किरकोळ कारणावरून केलेल्या आत्महत्येच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहे येथील पाटील गल्लीत दिनकर संपतराव पाटील हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. आज बुधवारी नेहमीप्रमाणे घरातील दोन्ही मुले खेळत होती. दुपारी पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर आर्यन व त्याचा भाऊ घरी आले. त्यांनी टी व्ही लावला. दोघा भावंडांना वेगवेगळे चॅनेल पहायचे होते. यातून मलाच रिमोट दे, म्हणत भांडणे सुरू झाली. दरम्यान दुपारी सव्वाबाराच्या वाजण्याच्या सुमारास आर्यन याने रागाच्या भरात बेड खाली ठेवलेली दोरी घेऊन वरच्या मजल्यावरील तुळईला गळफास घेत आत्महत्या केली.
आईला वरील मजल्यावर काहीतरी वाजल्याचा आवाज ऐकू आल्याने ती वर गेली असताना मुलगा आर्यन हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. आईने केलेल्या आरडाओरडा ऐकून शेजारील लोक गोळा झाले त्यांनी आर्यनला खाली उतरवले.आणि इस्लामपूर येथील डॉ. गोसावी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तो मृत झाला होता. तेथील डॉ. मेघा रावळ यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
आर्यन हा बहे येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता आठवीत होता. या घटनेने बहे गावावर शोककळा पसरली असून लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तपास करीत आहेत.