इस्लामपूर (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत सुरू केलेल्या ” माणुसकीचं नातं” उपक्रमाचा आज शनिवारी ५० वा दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या दरम्यान भुकेल्या नागरिकांना आणि गरजू कुटुंबांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपणाऱ्या ” त्या ” राबणार्या हातांचा शनिवारी (ता.१६ ) सन्मान करण्यात आला.
सुवर्णमहोत्सवी दिवसाचे औचित्य साधत गेले ५० दिवस अथकपणे फूड पॅकेट्सचे पॅकिंग करणाऱ्या आणि दोन वेळचे जेवण गरजूंना पोहोचवणाऱ्यांचा सन्मान केला गेला. महिला पोलीस सारिका घाडगे व सुनीता साळुंखे तसेच वाटपाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार संपत वारके,यशवंत कोळी,प्रशांत यादव जेवणाचे नियोजन करणारे पिंटू यादव यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत कौटुंबिक सत्कार झाला.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धात इस्लामपूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे २६ रुग्ण आढळले अन इस्लामपूर शहर चर्चेत आले.
त्यांनंतर इस्लामपूरकरांनी एका वेगळ्या शिस्तीचे दर्शन घडविले अन् त्यातून कोरोना मुक्तीचा इस्लामपूर पॅटर्न निर्माण झाला. सुरवातीला इस्लामपूर शहर पूर्णतः बंद झाले होते. कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. याच दरम्यान आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन , पोलीस अधिकारी व कर्मचारी, नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली होती. कोरोना वाढू नये म्हणून दक्षता घेत असताना सतत कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत होती.
अशा वातावरणात झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब लोक,परप्रांतीय लोक,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अन् हातावरचे पोट असणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला होता.ते पुरते हतबल झाले होते.
अशा लोकांच्या दोन वेळच्या जेवण मिळणे मुश्कील झाले होते. अशा नागरिकांच्या साठी काही करता येईल का ? असा विचार पुढे आला.. अन् पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ” माणुसकीचं नातं ” हा ग्रुप निर्माण केला. या संकल्पनेला उद्योजक सर्जेराव यादव, डॉ. अशोक शिंदे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठींबा दिला.
इस्लामपूर शहरातील अनेक दिलदार, निस्पृह अन संवेदनशील मनाच्या लोकांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली..सकाळी-संध्याकाळी ७७५फूड पॅकेट्स वितरीत केली जात आहेत. गरीब लोकांना आजअखेर १३२० अन्नधान्याचे महिनाभर पुरेल असे किट्स वाटप केले आहेत. हा उपक्रम १६ मे दिवशी पन्नासाव्या दिवसात म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वाटचाल करत आहे.
गेल्या ५० दिवस माणुसकीचं नातं हा उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक मदत करणारे असंख्य दाते ह्या उपक्रमाचे शिल्पकार आहेत. पैसे देणारे हात पुढे येतात पण प्रत्यक्षात पहिल्या दिवसांपासून फूड पॅकेट्सचे ‘पॅकेजिंग’ करणाऱ्या इस्लामपूर निर्भया पथकाच्या महिला पोलीस , हे जेवण इस्लामपूर शहरात अन शहरालगतच्या गावातील झोपडपट्टीत अन् घराघरात अथकपणे वितरण करणारे पोलीस हवालदार संपत वारके,यशवंत कोळी,प्रशांत यादव आणि सर्जेराव यादव हॉलचे काम पाहणारे पिंटू यादव हे ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता हे कोरोना योध्याप्रमाणे कार्यरत आहेत.
त्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. अनौपचारिक कार्यक्रमात माणुसकीचं नातं परिवाराच्या वतीने सर्जेराव यादव ,शामराव पाटील,रणजीत मंत्री, डॉ. एन. टी. घट्टे ,पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाले. तब्बल ५० दिवस गरीब व गरजू नागरिक, परप्रांतीय, दोन वेळचे अन्न देण्यासाठी माणुसकीचा नातं या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्ष फिल्डवर राहून दररोज गरजूंची भूक भागवण्यासाठी राबणाऱ्या हातांचा गौरव झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.