इस्लामपूर(प्रतिनिधी) – बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आलेली बहुचर्चित व्यायामशाळा तसेच हॉलचा ठराव बहुमताने झाला. त्याला अडीच महिने उलटले तरी अंमलबजावणी नाही. पालिका प्रशासनाने “त्या” वादग्रस्त इमारती ताब्यात घ्याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी निवेदने देत विकास आघाडीचे उपाध्यक्ष व नगरसेवक वैभव पवार यांनी शासन दरबारात साकडे घातले आहे. राजकीय दबावामुळे जाणीवपूर्वक कारवाईची टाळाटाळ केली जात आहे. “त्या ” इमारतींचा ताबा घ्यावा अन्यथा १ जून पासून उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक पवार यांनी दिला आहे.
पवार म्हणाले, “निनाईनगर मधील जयंत पाटील एन. ए. कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची व्यायामशाळा व हॉल हस्तांतराबाबत नियमांचा भंग होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. करार बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. २२ मार्चला झालेल्या सर्वसाधारण सभेत व्यायामशाळा व हॉल ताब्यात घेण्याचा बहुमताने ठराव मंजूर झाला आहे. परंतु अद्यापही मुख्याधिकारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही नाही. ही बाब गंभीर आहे.
नगरविकास विभागानेही तरतुदीनुसार जमिनीची वहिवाट, निविदा जाहिरात देऊन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. आधी तीन वर्षे कराराने देऊन नंतर मुदतवाढ ठराव नसताना जागा संस्थेच्या ताब्यात ठेवण्याचे प्रयोजन काय? प्रशासन राजकीय दबावापोटी कार्यवाही टाळत आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
ठराव होऊनही मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाही केलेली नाही. राजकीय दबावामुळे कारवाईला टाळाटाळ केली जात आहे. सभागृहात बहुमताने झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी सदरच्या ठरावाच्या व तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, मंत्रालय विरोधी पक्षनेते,विविध पक्षाचे अध्यक्ष, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,
जिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना निवेदनाने दिल्या आहेत.”नागरिकांची व नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान भरपाई टाळावी अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त केली आहे.
आष्टा नाका परिसरातील व्यायामशाळेच्या बाबतीतही तेच झाले आहे, त्यावरही तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहे. ३१ मे अखेर मुख्याधिकारी यांनी मंजूर ठरावाची अंमलबजावणी करून व्यायामशाळा व हॉल ताब्यात न घेतल्यास १ जूनपासून बेमुदत साखळी उपोषण करणार आहे.
व्यायामशाळा व हॉल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या संबंधितांकडे आहेत. त्या नाममात्र भाडयाने बेकायदेशीर ठराव करून वापरात असल्याचा प्रकार नगरपालिकेच्या सभेत नगरसेवक वैभव पवार यांनी उघडकीस आणला आहे. त्याचा पाठपुरावा करताना अद्यापही या इमारतींचा ताबा घेतला नसल्याने पवार आक्रमक भूमिकेत आहेत.