इस्लामपूर – महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर (जि. सांगली) येथील शिवभोजन केंद्रावर केंद्र संचालकांनी तब्बल दीडशे जणांना उपवासाची खिचडी,वेफर्स, केळी,अन् थंड गार ताकाचा फराळ खाऊ घातला. सुमारे अकरा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी गरीब गरजू नागरिकांची भूक भागवत आहे.
आज सर्वत्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरण असते. नागरिक यानिमित्ताने उपवास करीत असतात. सध्या गरिबांच्या घरी चूल पेटणे मुश्कील झाले आहे. उपवासाची खिचडी खाऊन नागरिक तृप्त झाले. भरपेट जेवल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल पंगत येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्रावर गुरुवारी नागरिकांनी फराळाचा आस्वाद घेतला. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी स्वागत केले.
कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी अनेकांची एकवेळ खाणे अन् जगण्याची धडपड सुरू आहे. गेली साडे अकरा महिने या शिवभोजन केंद्रावर तब्बल ५० हजारांहून अधिक थाळीचे वितरण झाले आहे. गुरूवारी महाशिवरात्री असल्याने केंद्र संचालिका अलका शिंदे यांनी आपल्या सहकारी सुलाबाई साळुंखे,अनिता शिंदे व घरातील महिलांच्या मदतीने उपवासाची खिचडी बनवली होती. रोजच्या दीडशे गरजू नागरिकांना शाबुची खिचडी, वेफर्स, केळी, ताक देण्यात आले.
अत्यंत गरजूंना शिवभोजन थाळी जगण्याचा हातभार आहे. यापूर्वीही दिवाळी, दसऱ्यासह वेगवेगळ्या सणासुदीला गोड-धोड जेवण दिले गेले आहे. इथं गरिबांच्या चेहऱ्यावर दररोज आनंद न्याहाळता येत असल्याची प्रतिक्रिया संचालिका अलका शिंदे यांनी दिली.
रणजित शिंदे यांनी संयोजन केले.